शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! ई-केवायसीसाठी मुदतवाढ

सध्या दहावी-बारावी परीक्षांचे निकाल, उत्तरपत्रिका तपासणी, निवडणूक कर्तव्य आणि इतर शैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना बँकेत जाऊन ई-केवायसी करणे अवघड होत होते, त्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! ई-केवायसीसाठी मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्यातील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी (Teaching and Non-teaching Staff) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ई-केवायसी (e-KYC) पूर्ण न केल्यास एप्रिल-मे महिन्याचे वेतन रोखण्याच्या शिक्षण विभागाच्या (Department of Education) कडक आदेशानंतर आता महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने मुदतवाढ जाहीर (Extension Announced) केली आहे. आता शिक्षकांना जून २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्यास वेळ मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने सेवार्थ प्रणाली आणि शालार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य केले होते. ई-केवायसी न केल्यास मे महिन्यातील वेतन वितरीत केले जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश जारी करण्यात आले होते. यामुळे राज्यातील जिल्हा परिषद, अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. सध्या दहावी-बारावी परीक्षांचे निकाल, उत्तरपत्रिका तपासणी, निवडणूक कर्तव्य आणि इतर शैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना बँकेत जाऊन ई-केवायसी करणे अवघड होत होते.

या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षण मंत्री आणि सचिवांना निवेदन दिले होते. परिस्थिती लक्षात घेऊन वित्त विभागाने परिपत्रक जारी करून मुदतवाढ दिली आहे. आता शिक्षक व कर्मचाऱ्यांना मे २०२६ देय जून २०२६ च्या वेतनापूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी लागेल. मात्र ही मुदत अखेरची असून, यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नाही, असे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे.