शिक्षण संस्थांमध्ये आता पोलिसांचे लक्ष; विद्यार्थ्यांना लावणार शिस्त

विद्यार्थ्यांकडून वाहतुकीच्या नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याच्या घटना घडत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पालकांनी याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे.

शिक्षण संस्थांमध्ये आता पोलिसांचे लक्ष; विद्यार्थ्यांना लावणार शिस्त

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सायबर गुन्हे, वाहतूक नियमांचे उल्लंघन,आमली पदार्थाचे सेवन यांसह शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे बेशिस्त वर्तन अशा वेगवेगळ्या बाबींवर आता पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये पुणे पोलिसांचे लक्ष राहणार आहे. पोलीस प्रशासनाने याबाबतचा आराखडा तयार केला असून पुढील वर्षभर या दृष्टीने काम केले जाणार आहे.त्यामुळे पुण्यातील शैक्षणिक संस्थांमधील वातावरण सुधारण्यास मदत होईल.  

पुणे शहर पोलिसांकडून ' शिक्षणात सुरक्षित क्षितिजे' या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,(Police Commissioner Amitesh Kumar) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी (Vice Chancellor Dr. Suresh Gosavi) सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शां.ब. मुजुमदार,(Dr. S.B. Mujumdar) ज्येष्ठ विधीज्ञ एस. के. जैन, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र कुलपती डॉ.विद्या येरवडेकर, अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख आणि अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह पुणे शहरातील नामांकित शिक्षण संस्थांचे प्रमुख या परिसंवादास उपस्थित होते.

अमितेश कुमार म्हणाले, समाज माध्यमांमध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहिला जात असून त्यामुळे विकारी वातावरण वाढत चालले आहे. अनेक विद्यार्थी मद्यपान करून वाहने चालवत असल्याचे निदर्शनास येत आहे. विद्यार्थ्यांकडून वाहतुकीच्या नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याच्या घटना घडत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पालकांनी याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच शैक्षणिक संस्थांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करायला हवे.विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागृती करायला हवी. शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात मद्य विक्री केले जाते, अशी दुकाने हटवणे हे प्रशासनाची जबाबदारी असली तरी शिक्षण संस्थांनी सुद्धा याबाबत लक्ष घालून पुढाकार घ्यायला हवा.

 सुरेश गोसावी म्हणाले, पुणे शहरात विविध देशांमधील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात त्यामुळे पुण्याचे ख्याती जगभर पसरली आहे. तर डॉ.मुजुमदार म्हणाले, गेल्या पन्नास वर्षात पुण्याच्या शैक्षणिक वातावरणात झपाट्याने बदल झाले आहेत शिक्षण संस्थांनी विद्यार्थी शिस्तीबाबत चर्चा करण्याची गरज आहे वेगवेगळ्या देशातून राज्यातून येणारे विद्यार्थी असतात. त्यामुळे शाळा महाविद्यालयात समुपदेशन केंद्र असली पाहिजेत.