मोठी बातमी : सततच्या पेपर फुटी प्रकरणात सरकारचे मोठे पाऊल : समिती स्थापन
राज्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये सतत होत असलेल्या पेपर फुटी प्रकरणी आता राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क :
राज्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये सतत होत असलेल्या पेपर फुटी प्रकरणी आता राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य शासनातील (State Government) पदभरती करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षांची कार्यपद्धती संरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. तीन महिन्याच्या आत यासंदर्भातील अहवाल राज्य सरकारला सादर करण्याच्या सूचणा समितीला देण्यात आल्या आहेत.
राज्यातील पेपर फुटी संदर्भात कडक कायदा करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सेवानिवृत्त अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सुरेश काकानी, डॉ. शहाजी सोळुंके, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) सचिव असणार आहेत.
समितीकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची कार्यपध्दती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी व पेपरफुट व इतर गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतील परीक्षा वगळता इतर विभागांतर्गत विविध संवर्गाच्या परीक्षांची कार्यपध्दती तसेच परीक्षांसंदर्भात पेपरफुटी व इतर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासकीय व कायदेशीर उपाययोजना या समितीकडून सुचवल्या जाणार आहेत. शासन निर्णय जाहिर केल्याच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत समिती आपला अहवाल राज्य सरकारला सादर करण्यार असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.