NEET पेपरफुटी प्रकरण : अकोल्यात अभ्यासू आणि होतकरू विद्यार्थिनीची हृदयद्रावक आत्महत्या
ही घटना केवळ वैयक्तिक नाही, तर भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेतील सखोल दोष दर्शवते. नीट सारख्या एकाच परीक्षेवर संपूर्ण वैद्यकीय प्रवेश अवलंबून असल्याने, पेपरफुटी किंवा गोंधळ झाल्यास लाखो विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
देशभरात नीट-युजी २०२६ (NEET-UG 2026) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाने निर्माण झालेल्या गोंधळामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे. या संकटाची किंमत फक्त परीक्षा रद्द होण्यापुरती मर्यादित नाही. तर हजारो गरीब-मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि भविष्यावर होत असलेल्या दुष्परिणामांची गंभीर उदाहरणे समोर येत आहेत. नीट पेपरफुटीमुळे आतापर्यंत जवळपास ७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात आता आणखीन एक अकोला जिल्ह्यातील (Akola News) हुशार, अभ्यासू आणि होतकरू विद्यार्थिनीच्या हृदयद्रावक आत्महत्येची भर (Female student's suicide) पडली आहे. भुमिका धबडघाव (२१ वर्षे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
भूमिका ही GNM नर्सिंग द्वितीय वर्षात अकोला येथे शिकत होती. वडील चौकीदार आणि आई धुणीभांडी करून कुटुंब चालवतात. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भूमिकाने नीट परीक्षा दिली होती. मात्र, पेपरफुटीमुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रचंड फीमुळे तिने नर्सिंगचा पर्याय स्वीकारला. तरीही शिक्षण खर्च पेलवणे कठीण झाले. महाविद्यालयाने प्रवेश घेतल्यानंतर सातत्याने फी वाढवल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. घरातील आर्थिक विवंचना, लहान भावाच्या शिक्षणाचा भार आणि स्वतःच्या शिक्षणाचा वाढता खर्च यामुळे भूमिका प्रचंड मानसिक दडपणाखाली होती. अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले.
ही घटना केवळ वैयक्तिक नाही, तर भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेतील सखोल दोष दर्शवते. नीट सारख्या एकाच परीक्षेवर संपूर्ण वैद्यकीय प्रवेश अवलंबून असल्याने, पेपरफुटी किंवा गोंधळ झाल्यास लाखो विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना बसतो. खासगी संस्थांमधील अनियंत्रित फी वाढ, प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकार आणि सरकारी जागांची अपुरता पुरवठा यामुळे मेरिट असूनही गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण नाकारले जाते.
शिक्षण हा मूलभूत हक्क असताना, त्याचे व्यावसायिकीकरण आणि आर्थिक भांडवलशाहीमुळे विद्यार्थी केवळ परीक्षा आणि कर्ज यांच्या चक्रव्यूहात अडकत आहेत. मानसिक आरोग्य समुपदेशक, शैक्षणिक कर्जावरील व्याज सवलती, सरकारी महाविद्यालये वाढवणे आणि परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता यांसारख्या उपाययोजनांशिवाय अशा घटना थांबणे सध्या तरी शक्य नाही. गुणवत्ता, समानता आणि मानसिक स्वास्थ्य यांना प्राधान्य देणारी सर्वसमावेशक शिक्षणव्यवस्था हाच खरा उपाय आहे. अन्यथा नीट पेपरफुटीचे बळी येत राहतील आणि होतकरू पिढी निराशेच्या खाईत लोटली जाईल.
आपल्या शिक्षणाचा आणि आपल्या लहान भावाच्या भविष्याचा मोठा आर्थिक भार आई-वडिलांवर पडत आहे, ही चिंता भूमिकाला आतून पोखरत होती. एका बाजूला नीट परीक्षेतील गोंधळामुळे डॉक्टर होण्याच्या वाटा बंद झाल्या आणि दुसऱ्या बाजूला घेतलेल्या नर्सिंग शिक्षणाचा खर्चही पेलवेनासा झाला. घरच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असल्याने आणि शिक्षणासाठी लागणाऱ्या अवाढव्य खर्चामुळे भूमिका गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक दडपणाखाली वावरत होती, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. याच तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.