कोणतेही संशोधन स्पर्धेपुरते मर्यादीत न ठेवता त्यातून बाजाराच्या गरजा पूर्ण करा - चंद्रकांत पाटील

संशोधनाच्या माध्यमातून तरुणांनी स्वत: उद्योग उभे करून देशाला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोणतेही संशोधन स्पर्धेपुरते मर्यादीत न ठेवता त्यातून बाजाराच्या गरजा पूर्ण करा - चंद्रकांत पाटील

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 देशात विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती होत असून नव्या पिढीला  उद्योगाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. या वातावरणाचा लाभ घेत कोणतेही संशोधन स्पर्धेपुरते मर्यादीत न राहता त्या माध्यमातून बाजाराच्या गरजा कशा पूर्ण करता येतील, आर्थिक उन्नती साधता येईल याचा युवकांनी विचार करावा.असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुण्यात केले. 

डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर पुणे यांच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित युवा उद्योजकांच्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे संस्थापक संचालक आणि उपाध्यक्ष एच. पी. श्रीवास्तव, स्टार्टअप आणि नाविन्यता समितीच्या अध्यक्षा सुप्रिया बडवे, श्रीकांत बडवे, रिलायन्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष सुशील बोर्डे आदी उपस्थित होते. 

 राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून युवा उद्योजकांना पुरस्कार प्रदान करण्याच्या उपक्रमंचे कौतुक करत पाटील म्हणाले, आपण संशोधनावर फारसे लक्ष न दिल्याने देशाला अनेक वस्तू आयात कराव्या लागल्या. संशोधनाच्या माध्यमातून तरुणांनी स्वत: उद्योग उभे करून देशाला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा युवा उद्योजकांना प्रोत्साहन देऊन एकप्रकारे उद्योजक घडविण्याचे कार्य डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर ही संस्था करीत आहे.  

हेही वाचा : स्पर्धा परीक्षा UPSC, MPSC चे टॉपरच तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीत ; 500 उमेदवारांची यादीच तयार

जगात नाविन्य, पेटंट आणि रॉयल्टी या तीन गोष्टींनी प्रगती साधता येणार असून त्यासाठी संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे. संशोधनाच्या माध्यमातून स्टार्टअप सूरू करण्यासाठी युवा उद्योजकांना शासनाचे सर्व सहकार्य राहील,या क्षेत्रातील विविध संधींचा लाभ घेत नवी कौशल्ये आत्मसात करावी. डेक्कन चेंबरने तरुण-तरुणींना असेच प्रोत्साहन देवून युवा उद्योजक घडवण्यासाठी यापुढेही कार्य करावे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. 

संशोधन करण्यासाठी विषयाचे आकलन गरजेचे असते. त्यामुळेच देशात नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी होत असून मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. व्यावहारिक ज्ञान व व्यवसायाभिमुख शिक्षणावरदेखील भर देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान चांगल्याप्रकारे होऊन त्यांची संशोधनाची वृत्ती वाढण्यास मदत होईल, असा विश्वास पाटील नी व्यक्त केला.