विद्यापीठाच्या अधिसभेबाहेर व्यवस्थापन परिषद सदस्याचे आंदोलन; कुलपतींना दिले निवेदन
मी अधिसभेच्या सभागृहबाहेर आज सकाळपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हे मी आपणास अधिकृत कळवत आहे. माझ्या जीवीताला आणि सामाजिक प्रतिमेला कुलगुरू गोसावी पुरस्कृत गुंड लोकांकडून धोका आहे. याची आपण राज्यपाल म्हणून दखल घ्यावी. आम्हा कुटुंबियांना संरक्षण द्यावे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या पहिल्या दिवशी विविध संघटनांनी आंदोलन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य यांनी अधिसभेबाहेर आंदोलन केल्याने विद्यापीठ वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. कुलगुरू यांनी माझी बदनामी केल्याचा आरोप करत सागर वैद्य यांनी आंदोलन सुरू केले असून एखाद्या व्यवस्थापन परिषद सदस्यांकडून कुलगुरू यांच्या विरोधात वैयक्तिक व कौटुंबिक कारणामुळे आंदोलन केल्याची ही पहिलीच घटना आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून जीविताला असलेला धोका आणि माझ्यासह कुटुंबाची सोशल मीडियावर बदनामी करण्याचे त्यांनी केलेले कटकारस्थान याच्या विरोधात मी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलना संदर्भात अशा आशयाचे निवेदन सागर वैद्य यांनी कुलपती यांना निवेदन दिले आहे.
सागर वैद्य म्हणाले, मी व्यवस्थापन परिषद सदस्य असून २१ , २२ , २३ मार्च २०२६ रोजी विद्यापीठातील व्यवस्थापन समिती, खरेदी समितीच्या बैठकीस उपस्थित होतो. या दरम्यान एक दिवस माझे कुटुंबीय ही माझ्या समवेत विद्यापीठ विश्रामगृहात खोली क्रमांक ४ मध्ये मुक्कामास होतो.या माझ्या विश्रामगृहातील निवास प्रसंगाचे छायाचित्रण कुलगुरूंचे हित संबंध सांभाळणाऱ्या काही विद्यार्थी संघटनांनी सदर छायाचित्रण उपलब्ध करून देण्याची मागणी कुलगुरूंकडे केली. कुलगुरूंनी आमच्या विद्यापीठाच्या स्टाफला बोलवून घेत त्यांच्या कार्यालयात सदर छायाचित्रण देण्यासंदर्भात या लोकांसमोर चर्चा केली. विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी हे CCTV फुटेज का हवे आहे याची विचारणा केली असता “ या आधारे मी काही बाहेरील महिला बरोबर विश्रामगृहात मुक्काम केला. अनैतिक वर्तन केले, अशी माझी बदनामी करणारी चर्चा सुरू केली.” हे कळल्यावर संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सदर षड्यंत्राचा विरोध केला. “ते माझे कुटुंब आणि दोन मुले आहेत. हे ते सिद्ध करत बसतील. आपण त्या महिलेचे चेहरे ब्लर करून हे करू असा उल्लेख झाला.” त्यानंतर सदर छायाचित्रण माहिती अधिकार कायद्याखाली मागणी करून घ्यावा असा निर्णय कुलगुरूंनी संबंधी विद्यार्थी संघटनांना दिला.
माझे कुटुंबियांबद्दल सुरू असलेल्या या षड्यंत्राचा उल्लेख आमच्या सदस्य श्रीमती बागेश्रीताई मंथळकर यांनी सभागृहात केल्यानंतर मी भावनावश झालो. कुलगुरूंना याविषयी बोलू देण्याची विनंती केली असता त्यांनी उलट माझ्यावरच चिडचिड सुरू केली. गैरजबाबदार वर्तन करून मला बोलण्यास परवानगी दिली नाही. यामुळे मला मानसिक धक्का बसला आणि मला माझ्या कुटुंबियांची काळजी वाटू लागली आहे.
माझी व कुटुंबियांची पत्नी, दोनही लहान मुलांची समाजमाध्यमावर जाहीर बदनामी करण्याचे कारस्थान कुलगुरु सुरेश गोसावी यांच्या उपस्थितीत कुलगुरू कार्यालयात होत असेल आणि याबद्दल आम्हाला विद्वत्त सभेत दबावतंत्राचा वापर करून गप्प केले जाणार असेल तर दाद मागायची कुठे?
या विरोधात मी अधिसभेच्या सभागृहबाहेर आज सकाळपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हे मी आपणास अधिकृत कळवत आहे. माझ्या जीवीताला आणि सामाजिक प्रतिमेला कुलगुरू गोसावी पुरस्कृत गुंड लोकांकडून धोका आहे. याची आपण राज्यपाल म्हणून दखल घ्यावी. आम्हा कुटुंबियांना संरक्षण द्यावे. तसेच या संपूर्ण प्रकारची विश्वसनीय पोलिस प्रशासनाकडून चौकशी करावी, ही विनंती.
दुसरे अत्यंत महत्वाचे, मी गेली ३ वर्षे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्राध्यापकांचे प्रश्न, घसरलेले रैंकिंग, उपकेंद्रांचा विकास, भ्रष्टाचार, गैरकारभार, अनियमितता, ब्लॅकमेलिंगचे मुद्दे घेवून आवाज उठवत आहे. या संदर्भातले दोन पत्रे मी तत्कालीन राज्यपालांना, मुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री यांनाही पाठवली होती. वेळोवेळी प्रसिद्धीमाध्यमातही याची चर्चा झाली होती. याचा राग मनात धरून मला लक्ष्य केले जात आहे याकडे मी आपले लक्ष्य वेधू इच्छितो.
गेल्या ३ महिन्यांपासून अशा अनेक प्रश्नांवरून मी पर्चेस कमिटी, व्यवस्थापन परिषद आदी व्यासपीठावर आवाज उठवत आहे. त्याचा राग धरून हे षड्यंत्र सुरू आहे. माझी आपणास विनंती आहे की, सदर कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचा राजीनामा घेवून किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून या सर्व गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करावी आणि आम्हाला संरक्षण द्यावे. तसेच, इतिहासात कधीही न झालेल्या, सा. फू. पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या हीन दर्जाच्या कृत्यांवर आळा घातला नाही, तर विद्यापीठाचे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे याकडे मी आपले विनम्रपणे लक्ष वेधू इच्छितो. असेही सागर वैद्य यांनी निवेदनात नमूद केले आहे.