साहित्य संमेलन लोकांचा सांस्कृतिक उत्सव ठरेल: कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी
१०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे पहिले संमेलन असल्याने त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. लोकसहभागातून हे संमेलन अधिक भव्य केले जाईल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
"आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे पुण्याच्या 'पुस्तकांची नगरी' या ओळखीवर शिक्कामोर्तब होईल. या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी भाषा भवनाला नवी झळाळी मिळेल. हे संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम न राहता एक व्यापक सांस्कृतिक उत्सव ठरेल," असा विश्वास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर, देशभरात आयोजित करण्यात येणाऱ्या ९९ साहित्य संमेलनांच्या नियोजनासाठी विद्यापीठात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) शाखा पदाधिकाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. सुरेश गोसावी बोलत होते.या प्रसंगी प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार,समर्थ युवा फाउंडेशनचे विश्वस्त राजेश पांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, मसापचे प्रदीप निफाडकर, प्रसाद मिरासदार, सुनील महाजन आणि बागेश्री मंठाळकर आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत देशभरातील शाखा आणि संस्थांचे २०० पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.
योगेश सोमण म्हणाले, "१०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे पहिले संमेलन असल्याने त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. लोकसहभागातून हे संमेलन अधिक भव्य केले जाईल. यातून मराठीला ज्ञान, संस्कृती, अस्मिता आणि रोजगाराची भाषा म्हणून सक्षम करत, देश-विदेशातील मराठी भाषिकांना एका धाग्यात जोडण्याचा संकल्प आहे."
राजेश पांडे यांनी सांगितले की , "देशभरात होणाऱ्या ९९ साहित्य संमेलनांच्या माध्यमातून बोलीभाषा व लोकसाहित्याचे 'मॅपिंग' केले जाईल. या उपक्रमामुळे 'मसाप'च्या राज्यातील शाखा अधिक बळकट होतील आणि जानेवारीतील मुख्य संमेलनात लाखो मराठी रसिकांना जोडण्यासाठी युवा कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले जाईल."
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्वाती महाळंक यांनी शाखांनी स्थानिक पातळीवर विषयांची निश्चिती करून मुख्यालयाशी नियमित समन्वय ठेवावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केले, तर प्रसाद मिरासदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.