हरिनामाच्या गजरात जाधवर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांकडून पर्यावरणाचा जागर
विद्यार्थ्यांनी नृत्य व विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून संतांच्या जीवनप्रसंग व कथांचा पट उलगडून दाखवला. या सर्व उपक्रमांमुळे वारकरी संप्रदायाची परंपरा आणि आधुनिक पर्यावरणाचा संदेश यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
‘प्लास्टिकला नकार, वारकऱ्यांचा निर्धार’ आणि ‘कचरा टाका डब्यात, विठ्ठल राहील मनात’ अशा सामाजिक व पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या फलकांनी परिसर दुमदुमून गेला होता. निमित्त होते नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अनोख्या पालखी सोहळ्याचे! हरिनामाचा गजर करत आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी मानाजीनगर नऱ्हे परिसरात फिरून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आणि जनजागृती केली.
नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी या पालखी सोहळ्यात अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. संस्थेच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या हस्ते पालखी पूजन व आरती संपन्न झाली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पालखी सोहळ्यानंतर संस्थेच्या सभागृहात विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘नदी जोड प्रकल्प’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आणि ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ यांसारख्या गंभीर व महत्त्वाच्या विषयांवर सादरीकरण करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यासोबतच विद्यार्थ्यांनी नृत्य व विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून संतांच्या जीवनप्रसंग व कथांचा पट उलगडून दाखवला. या सर्व उपक्रमांमुळे वारकरी संप्रदायाची परंपरा आणि आधुनिक पर्यावरणाचा संदेश यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला.