महात्मा फुले यांच्या मुळ गावात जिल्हा परिषदेच्या पहिल्या सीबीएसई शाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

या शाळेत पूर्व-प्राथमिक ते इयत्ता २ रीपर्यंतचे वर्ग २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार असून, आतापर्यंत सुमारे २६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पुढील टप्प्यात इतर वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.

महात्मा फुले यांच्या मुळ गावात जिल्हा परिषदेच्या पहिल्या सीबीएसई शाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

एज्युवार्त न्यूज नेटवर्क 

पुणे जिल्ह्यातील महात्मा जोतिबा फुले (Mahatma Phule) यांचे मूळ गाव असलेल्या पुरंदर जवळील खानवडी येथे 'ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळा' (Jyoti-Savitri ZP School) उभारण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (CBSE) संलग्न असलेली पुणे जिल्हा परिषदेची ही पहिली शाळा ठरलीय. महात्मा फुले यांच्या जयंती द्विशताब्दी वर्षाच्या औचित्याने आज या शाळेचा उद्घाटन (School Inauguration) सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मंत्री, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडला. 

सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर चालविण्यात येणारी ही राज्यातील पहिली शाळा असून, या शाळेच्या माध्यमातून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही शाळा क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समानता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या आदर्शांना समर्पित आहे. फुले दांपत्याने १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. त्यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित आणि विशेषतः मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे सीबीएसई अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे आणि सामाजिक समानता प्रस्थापित करणे हे या शाळेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. 

समानता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शांवर आधारित एक महत्त्वाकांक्षी शैक्षणिक प्रकल्प उभारण्यात आला असून, शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुमारे १२ एकर परिसरात उभारलेली ही आधुनिक शाळा पूर्व-प्राथमिक ते इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षण देणार आहे. येथे सीबीएसई अभ्यासक्रमासोबतच डिजिटल शिक्षण, सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक ग्रंथालय आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सरकारने २०२२ मध्ये या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिली असून, आवश्यक सर्व शासकीय परवानग्याही प्राप्त झाल्या आहेत.

या शाळेत पूर्व-प्राथमिक ते इयत्ता २ रीपर्यंतचे वर्ग २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार असून, आतापर्यंत सुमारे २६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पुढील टप्प्यात इतर वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, पुढील वर्षापासून इयत्ता ६ वीपासून निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ४० विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करण्यात येणार असून, ग्रामीण व दूरवरच्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. हा उपक्रम केवळ शिक्षणापुरता मर्यादित नसून, सामाजिक समता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा दाखवणारा ठरणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.