11th Admission : पहिल्याच दिवशी ४२ हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी, ३० एप्रिलपर्यंत मुदत 

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या नोंदणीप्रक्रियेला सुरुवात केली. त्यानुसार दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करून त्यांची प्राथमिक माहिती नोंदविता येणार आहे. यात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, तसेच आरक्षणासाठीचा प्रवर्ग, शाळेचे नाव व इतर तपशीलाचा समावेश आहे.

11th Admission : पहिल्याच दिवशी ४२ हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी, ३० एप्रिलपर्यंत मुदत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ (Academic year 2026-27) साठी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी (11th Class Admission Process) यंदाही राज्यस्तरावर ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. शिक्षण विभागातर्फे (Department of Education) विद्यार्थ्यांना शुक्रवार दि. १० एप्रिलपासून नोंदणी करण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी राज्यस्तरातून सुमारे ४२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी (42,000 Student Registrations) केली. पात्रताधारक विद्यार्थ्यांना ३० एप्रिलपर्यंत नोंदणी करून अर्जाचा भाग एक भरता येईल.

यापूर्वी केवळ महत्त्वाच्या महापालिकांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांत इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रिभूत ऑनलाइन प्रवेशपरीक्षा घेतली जात होती; परंतु गेल्या शैक्षणिक वर्षापासून राज्यस्तरावर एकाच संकेतस्थळाच्या माध्यमातून ही केंद्रिभूत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. यंदा राज्यातील ९ हजार ५५१ महाविद्यालयांनी नोंदणीसाठी सहभाग घेतला आहे. एकूण जागांची उपलब्धता अद्याप उपलब्ध करण्यात आली नसली तरी, अंदाजे २२ लाख जागा ११ वी प्रवेशासाठी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

प्रवेशाच्या प्रक्रियेत अर्जाचा भाग दोन अतिशय महत्त्वाचा असतो. यात विद्यार्थ्यांनी त्यांना प्रवेश घ्यावयाच्या शाखा व महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवायचा असतो. त्यांचा पसंतीक्रम व मिळालेले गुण यांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्याआधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. सध्या अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू असून, निकालानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळाला भेट देता येईल. 

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या नोंदणीप्रक्रियेला सुरुवात केली. त्यानुसार दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करून त्यांची प्राथमिक माहिती नोंदविता येणार आहे. यात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, तसेच आरक्षणासाठीचा प्रवर्ग, शाळेचे नाव व इतर तपशीलाचा समावेश आहे. नोंदणीला सुरुवात होताच, राज्यस्तरावर अर्ज दाखल करण्यासाठी लगबग पाहायला मिळाली. सध्याच्या वेळापत्रकानुसार नोंदणीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत असेल.