प्राध्यापक भरतीसाठी पुणे-मुंबई पायी मोर्चा; नेट-सेट धारकांची संघर्ष पदयात्रा
नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येत्या २० व २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सत्याग्रह आंदोलन ७ व संघर्ष पदयात्रा ४ चे आयोजन करण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्र शासन व यूजीसीच्या (Central Government and UGC) निर्देशानुसार शंभर टक्के प्राध्यापक भरती (Professor recruitment) करावी, तसेच सीएसबी (clock hour basis) पद्धत कायमची बंद करून समान काम समान वेतन (वर्षभराच्या नियुक्तीसह ८४ हजार रुपये दरमहा वेतन) लागू करावे, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती (Appointment of Assistant Professors) करावी, या प्रमुख तीन मागण्यासाठी नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य (NET-SET, Ph.D. Holders Struggle Committee Maharashtra State) यांच्या वतीने येत्या २० व २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सत्याग्रह आंदोलन व संघर्ष पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील अशासकीय महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले. मात्र, यूजीसीच्या नियमानुसार प्रत्येक महाविद्यालयांमध्ये कमीत कमी ८० टक्के प्राध्यापक पूर्णवेळ असायला हवे. परंतु, महाराष्ट्र शासनाने याला हरताळ फासला आहे. आजच्या स्थितीत प्रत्येक महाविद्यालयात केवळ ३० ते ४० टक्के प्राध्यापक कार्यरत आहेत. उर्वरित CHB पद्धतीवर काम करत आहेत. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयात १०० टक्के पदभरती करण्यात यावी.
याबरोबरच CHB तत्वावर ज्या प्राध्यापकांची भरती केली जाते त्यांना अल्प मानधन दिले जाते. परंतु, युजीसीच्या नियमानुसार १० टक्केच फक्त CHB तत्त्वावर प्राध्यापक भरती असेल पण ही भरती करत असताना पूर्णवेळ प्राध्यापकाच्या पगाराएवढाच त्यांनाही पगार मिळाला पाहिजे,अशी तरतूद असताना महाराष्ट्र शासनाकडून CHB प्राध्यापकांना केवळ १५ ते २० हजार रुपये मानधन देते. त्यामुळे समान काम समान धोरण लागू करावे.
प्राध्यापक भरतीसाठी उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आग्रही:11 हजार 87 पदे रिक्त
विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये संस्थाचालक पूर्णवेळ प्राध्यापक भरती करत नाही. त्यांना तात्पुरत्या स्वरुपात घेतलं जात. त्यांना ऑर्डर दिली जात नाही. पगारही खूप कमी दिला जातो, अशा महाविद्यालयांमध्येही प्राध्यापक भरती झाली पाहिजे, याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे.
पुढील दोन महिन्यात प्राध्यापक भरतीचा अध्यादेश जाहीर करावा. मात्र, जर प्राध्यापक भरती केली नाही तर येणाऱ्या मार्च-एप्रिलमध्ये राज्यातील विद्यापीठातील सर्व परीक्षांवर सर्व नेट-सेट, पीएच.डी धारक प्राध्यापक बहिष्कार टाकतील कुठल्याही प्रकारचे परीक्षांचे मूल्यमापन, पर्यवेक्षण व इतर कोणतीही कामे CHBचे प्राध्यापक करणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्याचे नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक प्रा.यशवंत खैरनार यांनी शासनाला दिला आहे.