आयटीआय प्रवेश: पहिली गुणवत्ता यादी जाहीर; १.७० लाख विद्यार्थी स्पर्धेत, वेळापत्रक प्रसिद्ध
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरातून एकूण १ लाख ७० हजार ३९९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यात १ लाख ४२ हजार ५९२ मुलं तर २७ हजार ८०७ मुलींचा समावेश आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्ज संख्येत किरकोळ घट दिसून आली असली तरी गुणवंत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढल्याचे चित्र समोर आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआय संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेसाठीची (ITI Admission Process) पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध (First merit list published) करण्यात आली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने यासोबत नियमित प्रवेश फेऱ्यांचे संपूर्ण वेळापत्रकही प्रसिद्ध (Schedule also released) केले आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणाऱ्या २३ गुणवंत विद्यार्थ्यांनीही आयटीआयसाठी अर्ज केल्याने कौशल्य विकासाकडे होत असलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा कल स्पष्ट झाला आहे. पहिल्या यादीसाठी एक लाख ७० हजार विद्यार्थी (One lakh 70 thousand students) स्पर्धेत होते.
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरातून एकूण १ लाख ७० हजार ३९९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यात १ लाख ४२ हजार ५९२ मुलं तर २७ हजार ८०७ मुलींचा समावेश आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्ज संख्येत किरकोळ घट दिसून आली असली तरी गुणवंत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे आयटीआय अभ्यासक्रमांची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसते.
संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पहिल्या गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ७ जुलै या कालावधीत संबंधित संस्थेत जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. याच काळात दुसऱ्या फेरीसाठी पर्याय भरण्याची सुविधाही उपलब्ध असेल. त्यानंतर १२ जुलै रोजी दुसरी, २१ जुलै रोजी तिसरी आणि ३० जुलै रोजी चौथी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे
प्रवेश निश्चिती : ३ ते ७ जुलै
दुसरी गुणवत्ता यादी : १२ जुलै
प्रवेश निश्चिती : १३ ते १६ जुलै
तिसरी गुणवत्ता यादी : २१ जुलै
चौथी गुणवत्ता यादी : ३० जुलै
प्रवेश निश्चिती : ३१ जुलै ते ४ ऑगस्ट
नव्याने नोंदणी व अर्ज निश्चिती : ३ जुलै ते ४ ऑगस्ट
संस्थास्तरीय समुपदेशन फेऱ्यांचे वेळापत्रक १ ऑगस्टपर्यंत जाहीर होणार. या प्रवेश प्रक्रियेमुळे हजारो विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाची संधी मिळणार आहे. संचालनालयाने विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर नियमित अपडेट तपासण्याचे आवाहन केले आहे. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेळेवर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असेही सांगण्यात आले आहे.