राज्यातील सर्व शाळांच्या इमारतींची मान्सूनपूर्वी तपासणी पूर्ण करा, सरकारचे कडक निर्देश
पावसाळ्यात इमारतींची पडझड, गळती, विद्युत अपघात आणि आरोग्य समस्या उद्भवू नयेत म्हणून शासनाने कडक निर्देश जारी केले आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत सर्व शाळांना हे परिपत्रक पाठवण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील सर्व शासकीय (All Government Schools) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये Local Self-Government Schools) विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने पावसाळापूर्व आणि पावसाळ्यानंतर शाळेच्या इमारतींची तपासणी पूर्ण करणे अनिवार्य (Pre-monsoon inspection is mandatory) केली आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांनी याबाबत शाळांना कडक निर्देश दिले आहेत.
पावसाळ्यात इमारतींची पडझड, गळती, विद्युत अपघात आणि आरोग्य समस्या उद्भवू नयेत म्हणून शासनाने कडक निर्देश जारी केले आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत सर्व शाळांना हे परिपत्रक पाठवण्यात आले आहे. १५ मे २०२६ पर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शाळा इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकघर आणि शौचालयांची सखोल तपासणी करावी लागणार आहे. भेगा पडलेल्या भिंती, कमकुवत छत, सैल प्लास्टर, गळती होणारे छत, खिडक्या-दरवाजे आणि गटार व्यवस्थेची तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. वर्गात पाणी शिरू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्वयंपाकघरात गॅस जोडण्या, धूरबाहेर काढण्याची व्यवस्था, इंधन साठवणूक आणि स्वच्छता तपासली जाईल. शौचालयांची स्वच्छता, पाण्याची उपलब्धता आणि निर्जंतुकीकरणही अनिवार्य आहे. विद्युत प्रणालीतील उघड्या तारा, सदोष उपकरणे दुरुस्त करावीत. धोकादायक झाडांची छाटणी, पाणी साचू नये यासाठी उपाययोजना आणि मुसळधार पावसात जीर्ण इमारतींचा वापर थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पावसाळ्यानंतर डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी आरोग्य तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवली जाईल. सर्व शाळांनी तपासणी अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे.
“विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही स्तरावर तडजोड केली जाणार नाही. शाळा ही सुरक्षित आणि स्वच्छ असली पाहिजे.” ही मोहीम राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणार असून, पालक, शिक्षक आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. भोयर यांच्या कडून करण्यात आले आहे.