दहावी-बारावी खासगी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; १७ नंबर अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात
महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थी, जे विविध कारणांमुळे शाळेत नियमित उपस्थित राहू शकले नाहीत किंवा शिक्षण अर्धवट सोडावे लागले, त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (Economically Weaker Students Board Exam) कुटुंबातील विद्यार्थी, जे विविध कारणांमुळे शाळेत नियमित उपस्थित राहू शकले नाहीत किंवा शिक्षण अर्धवट सोडावे लागले, त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांसाठी खासगी (Maharashtra Board Private Student Application) विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज (17th number application 10th 12th) भरता येणार आहे. या विशेष प्रक्रियेची सुरुवात आज १ ऑगस्ट २०२६ पासून झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांना नियमित, विलंबित आणि अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले की, घरच्या आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेद्वारे पुन्हा शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. अर्ज करण्याची मुदत तीन टप्प्यात विभागली गेली आहे. १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान नियमित शुल्कासह, १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान विलंब शुल्कासह तर १६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान अतिविलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जातील. दहावी व बारावीसाठी नोंदणी शुल्क १११० रुपये, प्रक्रिया शुल्क १०० रुपये आणि विलंब शुल्क १०० रुपये इतके आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत किंवा द्वितीय प्रत व प्रत affidavits), आधारकार्ड आणि स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो. विद्यार्थ्यांनी प्रथम ज्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातून परीक्षा द्यायची आहे, त्या ठिकाणी जाऊन सांकेतिक क्रमांक, विषय योजना, माध्यम आणि शाखेची माहिती घ्यावी. नंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर स्टुडंट कॉर्नरमध्ये नोंदणी करावी. सर्व कागदपत्रे स्कॅन करून किंवा मोबाइलद्वारे पीडीएफ स्वरूपात अपलोड करावीत. जिल्हा, तालुका आणि माध्यमानुसार येणाऱ्या शाळांच्या यादीतून योग्य शाळेची निवड करावी.
अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट, शुल्क भरण्याची पोचपावती आणि मूळ कागदपत्रे निवडलेल्या शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयात दिलेल्या मुदतीत जमा करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पूर्ण करणारे विद्यार्थी नियमित परीक्षार्थींप्रमाणे मार्च २०२७ च्या बोर्ड परीक्षेला बसू शकतील. मंडळाने विद्यार्थ्यांना वेळेवर अर्ज करण्याचे आवाहन केले असून, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर सूचना वाचण्याचे आवाहन केले आहे. ही योजना अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याला नवी दिशा देणारी ठरेल, असे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.