एमपीएससी कृषी सेवा मुख्य परीक्षा मूल्यमापनात मोठा घोटाळा समोर; १३५ गुणांचे झाले थेट ६८ गुण

MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ मध्ये गुणांमध्ये मोठी तफावत आढळल्याने मूल्यमापनाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यमापन आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

एमपीएससी कृषी सेवा मुख्य परीक्षा मूल्यमापनात मोठा घोटाळा समोर; १३५ गुणांचे झाले थेट ६८ गुण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटनांमुळे आधीच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना आता कृषी सेवा मुख्य परीक्षा-२०२४च्या मूल्यमापन प्रक्रियेवरही विद्यार्थ्यांनी तीव्र आक्षेप घेतले आहेत. माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या गुणपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या आधारे मूल्यमापनात मोठ्या विसंगती आढळल्या आहेत. या परीक्षेत दोन्ही पेपर प्रत्येकी २०० गुणांचे होते. विद्यार्थी सर्व उत्तरपत्रिकांची फेरतपासणी किंवा पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी करीत आहेत.

काही प्रकरणांत पहिल्या परीक्षकाने उमेदवाराला १३५ गुण दिले. त्यानंतर नियामकाने हे गुण १०१ पर्यंत कमी केले तर दुसऱ्या नियामकाने आणखी घटवून ६८ गुणांवर आणले. मूळ गुणांमध्ये तब्बल ६७ गुणांची म्हणजेच सुमारे ४९ टक्के घट झाली आहे. एवढ्या मोठ्या तफावतीमुळे पहिल्या परीक्षकाने कोणत्या निकषांनुसार इतके जास्त गुण दिले, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मूल्यमापनातील ही गंभीर गडबड आयोगाच्या प्रक्रियेवर शंका निर्माण करणारी आहे.

विद्यार्थ्यांनी उपलब्ध कागदपत्रांचा हवाला देत पेपर-२मध्ये एका उमेदवाराला १८१ गुण म्हणजेच ९०.५ टक्के गुण मिळाल्याचे निदर्शनास आणले आहे. तसेच ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची संख्या १३० असल्याचा दावा करण्यात आला आहे. एवढे अधिक गुण कोणत्या प्रमाणित निकषांच्या आधारे देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माहिती अधिकाराने मिळालेल्या उत्तरपत्रिकांमध्ये काही प्रश्नांच्या गुणदानाबाबतही आक्षेप आहेत. एका १५ गुणांच्या प्रश्नाला केवळ तीन मुद्दे लिहिल्यानंतर आठ गुण दिले गेले, तर अपेक्षित स्वरूपाचे उत्तर नसतानाही इतर प्रश्नाला दहा गुण मिळाले. पेपर-२मधील एका प्रश्नातील चार उपप्रश्नांसाठी २० पैकी २० गुण देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या सर्व बाबींमुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यांची मागणी आहे की सर्व उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करावी, परीक्षक व नियामकांच्या गुणांतील तफावतीची चौकशी करावी तसेच मॉडरेशन प्रक्रियेची स्वतंत्र पडताळणी करावी. या शंकांचे निरसन होईपर्यंत कृषी सेवा मुख्य परीक्षा-२०२४च्या निकालावर आधारित पुढील प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशीही त्यांची ठाम भूमिका आहे. आयोगाने याबाबत स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे जेणेकरून परीक्षेची विश्वासार्हता कायम राहील.