प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; शैक्षणिक पात्रतेबाबत MPSC कडून दिलासा
आयोगाकडून याबाबतची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी दि. ९ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती. आता उमेदवारांना दि. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
![प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; शैक्षणिक पात्रतेबाबत MPSC कडून दिलासा](https://eduvarta.com/uploads/images/2023/04/image_750x_6444e4581c60e.jpg)
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) उच्च व तंत्र शिक्षण विभागातील (Higher and Technical Education) विविध विषयांतील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांसह शारिरीक शिक्षण निर्देशक, अधिव्याख्याता या पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या पदांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत संभ्रम निर्माण झाल्याने अनेकांना अर्ज भरता आले नाहीत. यापार्श्वभूमीवर आयोगाकडून अशा उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी दिलासा दिला असून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. (Professor Recruitment News)
आयोगाकडून याबाबतची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी दि. ९ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती. आता उमेदवारांना दि. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. जाहिरातील समतुल्य अर्हताधारक उमेदवारांमध्ये अर्ज सादर करण्यामध्ये संदिग्धता निर्माण झाल्यामुळे बऱ्याच उमेदवारांकडून दूरध्वनीद्वारे, ईमेलद्वारे, निवेदने आयोगाकडे प्राप्त झाली आहेत. याबाबत आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आयोगाने म्हटले आहे की, जाहिरातींमध्ये नमूद केलेल्या विषयाच्या समतुल्य शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्यास त्यांच्या समतुल्य अर्हतेबाबत भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यावर तपासणी करण्याच्या आधीन राहून संबंधित उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित समतुल्य अर्हताधारक उमेदवारांनी अर्ज सादर करताना Equivalent to (relevant Subject) अशी अर्हता नमूद करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज भरण्यासाठी आयोगाकडून दि. १७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना दि. १७ नोव्हेंबरपर्यंत विहित परीक्षा शुल्क ऑनलाईन भरता येईल. तर भारतीय स्टे बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्यासाठी दि. १९ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. चलनाद्वारे दि. २० नोव्हेंबरपर्यंत शुल्क भरता येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. यापुर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असेही आयोगाने म्हटले आहे.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.