राज्यातील शाळा, महाविद्यालयांना अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे शिक्षण विभागाकडून प्रशिक्षण
अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे शिक्षण विभागाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळणार आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
याआधी शहरी भागापूरती मर्यादित असलेली अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (11th Online Admission Process 2025-26) यंदा राज्यात राबवली जाणार आहे. त्यासाठी अकरावी प्रवेश प्रक्रिया (11th Admission Process) राबवणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे शिक्षण विभागाकडून प्रशिक्षण (Training for schools and colleges from the Education Department) दिले जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळणार आहेत.
यंदा ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये सर्वांसाठी ही पद्धत वापरली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आता माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने यापूर्वीच प्रवेशाचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी सुरू झाल्यानंतर शिक्षण संस्थांनी त्या संदर्भात कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे, याबाबत हे ऑनलाइन प्रशिक्षण घेतले जाणार आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार ८ ते १५ मे दरम्यान प्रत्येक माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी तपशीलासकट माहिती भरणे आणि ती अद्ययावत करणे आवश्यक असेल. ही माहिती ८ ते १६ मे या कालावधीत विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून प्रमाणित केली जाणार आहे. १९ ते २८ मेपर्यंत विद्यार्थ्यांचे संबंधितांनी ऑनलाईन प्रोफाइल तयार करणे आवश्यक आहे. याच काळामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना प्राधान्यक्रम भरणे सक्तीचे आहे.
या प्रक्रियेनंतर प्रवेश फेरीची सुरुवात करण्यापूर्वी व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा, इन हाऊस कोटा तसेच सर्वांसाठी खुले प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. त्यासोबत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ फेरी घोषित करणे, ऑगस्टपूर्वी प्रत्यक्ष प्रवेश देणे, ११ ऑगस्ट किंवा शिक्षण विभाग निर्धारित करेल त्या दिनांकाला उच्च माध्यमिकचे अकरावीचे वर्ग सुरू करणे, असे वेळापत्रक निश्चित केले आहे.
राज्यातील ग्रामीण आणि शहरी सर्वांसाठी ऑनलाईन प्रणालीशिवाय अन्य कोणत्याही प्रणालीद्वारे प्रवेश होणार नसून हे प्रवेश सुकर होण्यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर सनियंत्रण समिती काम करणार आहे. शाळा व्यवस्थापनाला ऑनलाइन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रणालीमधून एकही प्रवेश करता येणार नाही, अशी अटदेखील शिक्षण विभागाने घातलेली आहे.