मोठी बातमी: विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवांनी राजीनामा दिल्याची चर्चा ?
विद्यापीठाचे रॅंकिंग गेल्या काही वर्षात चांगलेच घसरले आहे.तसेच विद्यापीठाकडील मनुष्यबळ सुध्दा कमी होत चालले आहे.त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनावर चांगलाच ताण येत आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेण्यास फारसे कोणी इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कार्यभार सध्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. मात्र, विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकारे या सध्या रजेवर असून त्यांच्या पदाची जबाबदारी विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी चारूशीला गायके यांच्याकडे देण्यात आली आहे.मात्र,भाकारे यांनी वैयक्तिक कामामुळे पुढील काळात प्रभारी कुलसचिव पदाची जबाबदारी सांभाळणे शक्य नसल्याचे विद्यापीठाला सांगितले असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठ वर्तुळात सुरू असल्याचे अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. परंतु, विद्यापीठाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय केंद्राचे प्रमुख डॉ. विजय खरे यांच्याकडे कुलसचिव पदाची जबाबदारी दिली होती.पुढे पूर्णवेळ कुलसचिव नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात आली.मात्र,त्यात गोंधळ झाल्याने ही प्रक्रिया स्थगित करावी लागली.त्यानंतर विद्यापीठातर्फे विधी विभागातील प्राध्यापिका डॉ. ज्योती भाकरे यांच्याकडे प्रभारी कुलसचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. एक वर्षाहून अधिक कालावधीपासून भाकरे यांनी ही जबाबदारी सांभाळली.मात्र, त्यांनी पद सोडण्याची इच्छा बोलून दाखवल्याच्या चर्चेमुळे विद्यापीठाला पुन्हा एकदा नवीन प्रभारी कुलसचिवांचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाकडून हालचाली सुरू झाल्या असल्याचे सुध्दा बोलले जात आहे. त्यामुळे इच्छुकांनी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, याबाबत वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी डॉ. ज्योती भाकरे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही.परंतु, विद्यापीठाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रभारी कुलसचिव यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विद्यापीठाचे रॅंकिंग गेल्या काही वर्षात चांगलेच घसरले आहे.तसेच विद्यापीठाकडील मनुष्यबळ सुध्दा कमी होत चालले आहे.त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनावर चांगलाच ताण येत आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेण्यास फारसे कोणी इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच विद्यापीठाच्या प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे बोलले जात आहे. या सर्व बाबींचा परिणाम विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्तेवर होत आहे.त्यामुळे विद्यापीठाने तात्काळ पूर्णवेळ कुलसचिव नियुक्त करावे,अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना प्रभारी कुलसचिव हटाव विद्यापीठ बचाव, असे पत्र दिले आहे. प्रभारी अधिकारी नियुक्त करण्याएवजी पूर्णवेळ कुलसचिव नियुक्त करावे, अशी मागणी यादव यांनी केली आहे. तसेच विद्यापीठाने याबाबत तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.