NEET निकाल जाहीर होताच महाराष्ट्रात ३ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या; शिक्षण व्यवस्थेत मोठी खळबळ
पुण्यासारख्या शैक्षणिक केंद्रात ही समस्या अधिक गंभीर आहे. सततची स्पर्धा, कोचिंग क्लासेसचा दबाव, पालकांच्या अपेक्षा आणि भविष्याची चिंता यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बिघडते. शेवटी मानसिक दबावात येऊन हे विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग अवलंबतात.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) निकाल जाहीर (Results Declared) झाल्यानंतर पुण्यात दोन तर जामनेरमध्ये एका विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या (3 students committed suicide) घटना समोर आल्या आहेत. यामुळे शिक्षण व्यवस्थेतील वाढता दबाव, स्पर्धा आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. महंमदवाडी, धनकवडी आणि जामनेर येथे घडलेल्या या घटनांनी पालक, शिक्षक आणि प्रशासनात खळबळ उडवली आहे. NEET सारख्या परीक्षांमुळे निर्माण होणारा ताण हा केवळ वैद्यकीय प्रवेशापुरता मर्यादित नसून, संपूर्ण शिक्षण प्रणालीच्या अपयशाचे प्रतीक बनला आहे.
पहिली घटना महंमदवाडी येथे घडली. १८ वर्षीय अनुष्का आशिष चौगुले या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती NEET च्या तयारीत होती. निकालानंतर शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. काळेपडळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनुष्का ही मेहनती विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नसल्याने ती निराश झाली होती, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. दुसरी घटना धनकवडी येथील चव्हाणनगर परिसरात घडली. १७ वर्षीय रिद्धी रवी केडिया या विद्यार्थिनीने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
तिसऱ्या घटना मुळचा जामनेरचा असलेला परंतू पुण्यात शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय समर्थ ज्ञानेश्वर पाटील या विद्यार्थ्याने NEET नीटमध्ये अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या तीनही घटनांमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षेतील अपयश किंवा कमी गुणांमुळे मानसिक तणावाखाली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. पुणे पोलिसांनी प्रत्येक प्रकरणात स्वतंत्र चौकशी सुरू केली असून, आत्महत्या नोट किंवा इतर पुरावे शोधले जात आहेत. या घटनांमुळे शहरातील कोचिंग केंद्रांमध्येही चिंता वाढली आहे.
देशभरात NEET परीक्षेशी संबंधित आत्महत्या प्रकरणे वाढत आहेत. पेपर लीक प्रकरणानंतर झालेल्या फेरपरीक्षेनंतरही अनेक विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. पुण्यासारख्या शैक्षणिक केंद्रात ही समस्या अधिक गंभीर आहे. सततची स्पर्धा, कोचिंग क्लासेसचा दबाव, पालकांच्या अपेक्षा आणि भविष्याची चिंता यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बिघडते. शेवटी मानसिक दबावात येऊन हे विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग अवलंबतात.
शिक्षणमंत्री आणि NTA ने याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी अभ्यासक्रम सुधारणा, अधिक जागा उपलब्ध करणे आणि मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. या घटनांनंतर पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि अपयशाला सामोरे जाण्याची तयारी करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, अशा दुर्दैवी घटनांना पुनरावृत्ती रोखणे कठीण होईल.