मतभेद हे लोकशाहीचे दुर्बलत्व नाही तर सामर्थ्य :माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड 

कायद्यातील मौनांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की अनेक निर्णायक घटनांची सुरुवात दुर्लक्षित राहिलेल्या आवाजांकडे कान देण्यामुळे होते. 

मतभेद हे लोकशाहीचे दुर्बलत्व नाही तर सामर्थ्य :माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कायद्याने शिकवलेली महत्त्वाची सवय म्हणजे अनिश्चिततेसोबत जगणे आणि त्यात सहज राहणे. तसेच मतभेद हे लोकशाहीचे दुर्बलत्व नसून सामर्थ्य आहे. संविधान मतभेद संपवण्यासाठी नाही, तर त्यांच्यासोबत जगण्याची चौकट देण्यासाठी आहे. संविधान हे तयार उत्तरांचे पुस्तक नाही, तर मतभेद, अनुभव आणि संवादातून घडणारी जिवंत प्रक्रिया आहे,” असे प्रतिपादन माजी सरन्यायाधीश जस्टिस डी . वाय चंद्रचूड यांनी केले.

अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या (ADYPU) स्कूल ऑफ लॉ अँड लिबरल आर्ट्सतर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन, कुलसचिव डॉ. सुधाकर शिंदे, स्कूल ऑफ लॉ अँड लिबरल आर्ट्सचे अधिष्ठाता डॉ. सनी थॉमस, सहाय्यक प्राध्यापक केदार कुलकर्णी तसेच एडीवायपीयूचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

निर्णयातील नम्रता, भाषेची शिस्त आणि मानवी अनुभवांची व्यापकता यावर भाष्य करताना चंद्रचूड म्हणाले, प्रत्येक वाक्याचे परिणाम असतात, प्रत्येक विरामाला अर्थ असतो. काळानुसार मौनही बोलते.

पुस्तक लिहिण्यामागील भूमिका स्पष्ट करताना चंद्रचूड म्हणाले, भाषणे कायद्याला न्यायालयाबाहेर येण्याची संधी देतात. निर्णय वाद मिटवतात, तर भाषणे विचारमंथन आणि संवादाला वाव देतात.संविधान हे भूतकाळ व वर्तमान, संस्था व नागरिक, सत्ता व सद्सद्विवेक यांमधील जिवंत संवाद आहे.कायद्यातील मौनांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की अनेक निर्णायक घटनांची सुरुवात दुर्लक्षित राहिलेल्या आवाजांकडे कान देण्यामुळे होते. 

अपूर्ण राहिलेल्या घटनात्मक प्रश्नांवर बोलताना त्यांनी वैवाहिक बलात्कार अजूनही गुन्हा म्हणून मान्य नसल्याकडे लक्ष वेधले. “समाज बदलण्याची वेळ आली नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.