संशोधनात्मक दृष्टिकोन घडवणे हीच आजची गरज; कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचे प्रतिपादन
आविष्कार' ही केवळ वार्षिक स्पर्धा न ठरता वर्षभर चालणारी सातत्यपूर्ण संशोधन प्रक्रिया म्हणून समाजासमोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ. काळकर यांनी केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञानातून नव्हे, तर प्राध्यापकांच्या सजग आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून संशोधन वृत्ती निर्माण होत असते. त्यासाठी प्राध्यापकांनी स्वतः विनम्र संशोधकाची वृत्ती कायम ठेवत विद्यार्थ्यांचे सक्षम मार्गदर्शक होणे गरजेचे ठरते. याद्वारे वर्गातील पारंपरिक अध्यापनापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा संशोधनात्मक दृष्टिकोन घडवणे हीच आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी शुक्रवारी केले.
विद्यापीठात आयोजित एकदिवसीय 'शैक्षणिक आणि संशोधन समन्वयक' कार्यशाळेत कुलगुरू डॉ. गोसावी बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाचे संचालक डॉ. विनायक जोशी, 'आविष्कार' आयोजन समितीचे अध्यक्ष व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, डॉ. गिरीश टिल्लू, डॉ. राहुल पाडळकर आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यशाळेत ‘आविष्कार २०२६-२७’च्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापकांनी स्थानिक गरजा ओळखून व त्यासाठी उपलब्ध स्थानिक पद्धतींचे वैज्ञानिक मूल्यमापन करून त्यांचे संशोधन पुढे नेणे हे कालसुसंगत ठरते. त्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे अशा उपक्रमांची सुरुवात करणे रास्त ठरणार असल्याचेही डॉ. गोसावी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाशी निगडित अर्थशास्त्र व मर्यादांचे भान रूजविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
तर, अशा उपक्रमांद्वारे ‘आविष्कार' ही केवळ वार्षिक स्पर्धा न ठरता वर्षभर चालणारी सातत्यपूर्ण संशोधन प्रक्रिया म्हणून समाजासमोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ. काळकर यांनी केले. विद्यापीठाच्या माध्यमातून यंदा १२ हजार विद्यार्थ्यांपर्यंत ही स्पर्धा पोहोचविण्याचा मानस डॉ. वायदंडे यांनी व्यक्त केला. कार्यशाळेत १८ व्या राज्यस्तरीय 'आविष्कार' स्पर्धेतील विद्यापीठाच्या विजेत्या संघाचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
--------
आंतरविद्याशाखीय संशोधनांसाठी ‘आविष्कार’चे व्यासपीठ
विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक समस्यांच्या निराकरणासाठी आंतरविद्याशाखीय व बहुविद्याशाखीय दृष्टिकोन रुजवण्यासाठी ‘आविष्कार’ हे विद्यापीठाचे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरते. त्याद्वारे प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीबाहेरचे शिक्षण देणे सध्या कालसुसंगत ठरत असल्याचे मत डॉ. काळकर यांनी आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये मांडले. तर, सध्याच्या व भविष्यकालीन गरजा विचारात घेता प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांवर आपल्या डोक्यातील संशोधन प्रश्न लादण्यापेक्षा त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे उपयुक्त ठरत असल्याचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी प्राध्यापकांना सांगितले.
------------
विद्यार्थ्यांना समजून घेणारा आविष्कार हवा - डॉ. नितीन करमळकर
समाजासोबतचा संवाद कायम ठेवत, नेमक्या समस्या आणि संशोधनाच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांसाठीचे संशोधन प्रकल्प आखायला हवेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनाही समजून घ्यायला हवे. ‘जेन-झीं’नी अलिकडेच केलेल्या आविष्कारासारखा आविष्कार आपल्याला नको आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजून घेत आणि सर्व विद्याशाखांना समसमान ठेवत संशोधनांचा विचार करणे गरजेचे असल्याचे राज्याच्या ‘एनईपी टास्क फोर्स’चे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर यांनी समारोपाच्या सत्रात मांडले.
-----