पिझ्झा,कपड्यांवरील खर्च कमी करून पुस्तके घ्या 

प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांचे मत

पिझ्झा,कपड्यांवरील खर्च कमी करून पुस्तके घ्या 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुस्तकांमुळे वाचकाच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. मात्र वेब सीरिज, चित्रपटांतून प्रेक्षकांच्या कल्पना दृश्यांतून बंदिस्त केल्या जातात. पुस्तकांचे वाचन हा स्वसंवादाचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे पिझ्झा, कपडे (pizza, clothes) अशा गोष्टींवरील खर्च कमी करून पुस्तके विकत घेऊन ती वाचा, असे आवाहन प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास ( Poet Dr. Kumar Vishwas ) यांनी केले. पुस्तकांमुळे आत्म्याची इम्युनिटी वाढते. वाचलेले मनात राहते आणि कधी ना कधी कामी येते,असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात ' कवी  की कल्पना से ' या विषयावर डॉ. कुमार विश्वास यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रसेनजित फडणवीस आदी उपस्थित होते.

गेली  ३५ वर्षे, ४४ देशांत  रंगमंचावरून कविता सादर करत असल्याचे सांगून डॉ. कुमार विश्वास म्हणाले, की चुकीच्या गोष्टींवर भाष्य करणे हे कवीचे काम आहे. सरकारे येतील आणि जातील, पण लोकशाही टिकली पाहिजे, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे. त्यामुळे कवींनी निर्भयपणे बोलले पाहिजे. चौथीत असताना मला लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य पारितोषिक म्हणून मिळाले होते. विनोबा भावे, ओशो अशा अनेकांनी गीतेवर उत्तम लेखन केले आहे. मात्र कर्मयोगाच्या संदर्भात टिळकांचे गीतारहस्य सर्वोत्तम आहे. चांगले असणे आणि यशस्वी असणे यात फरक आहे. त्यामुळे चांगले होण्यासाठी वाचणे आवश्यक आहे. वाचनाने माणूस चांगला होतो. प्रत्येक विषयाचे विविध आयाम समजून घेण्यासाठी विविध प्रकारची पुस्तके वाचली पाहिजेत.

व्याख्यानानंतर विश्वास यांनी कोई दिवाना कहता है ही त्यांची प्रसिद्ध रचना सादर केली. त्यांचे व्याख्यान आणि सादरीकरणाला उपस्थितांचा उत्तम प्रतिसाद लाभला. 

तावडे म्हणाले, कुमार विश्वास हे महत्त्वाचे कवी आहेत. त्यांनी कवींचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्यामुळे अनेक नव्या कवींना ओळख मिळाली. महाराष्ट्रात पुस्तके विकत घेऊन वाचली जातात हे साहित्य संमेलनातील पुस्तकांच्या खपांच्या आकड्यांतून कळते. त्यामुळे हा पुणे पुस्तक महोत्सव वाचकांसाठी पर्वणी आहे.