शालेय शिष्यवृत्तीच्या रक्कमेत मोठी वाढ; मंत्री संजय शिरसाट यांची विधान परिषदेत घोषणा

राज्यातील जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.

शालेय शिष्यवृत्तीच्या रक्कमेत मोठी वाढ; मंत्री संजय शिरसाट यांची विधान परिषदेत घोषणा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी (Students from Backward Classes) महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत (Savitribai Phule Scholarship Scheme) देण्यात येणाऱ्या मागासवर्गीय शालेय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ (Increase in Scholarshi) करण्यात आली आहे.  इयत्ता पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ६० रुपयांवरून २५० रुपये तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा १०० रुपयांवरून ४०० रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Minister Sanjay Shirsat) यांनी विधान परिषदेत दिली. शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी आणि विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवताना अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री शिरसाट यांनी सांगितले की, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २५० ते ४०० रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे शिक्षण पूर्ण करण्यात अडचणींचा सामना करतात. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती महत्त्वाची ठरते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही योजना अधिक प्रभावी करण्याचा निर्णय घेतल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीबाबत लवकरच संबंधित विभागाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असेही मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.