मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय, तब्बल ३०४ अभ्यासक्रमांच्या परीक्षा कायमच्या बंद..
मुंबई विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रम कालांतराने विद्यार्थी संख्येअभावी बंद पडले, तर काही अभ्यासक्रमांचे स्वरूप बदलले. आतापर्यंत अशा अभ्यासक्रमांमध्ये पूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून परीक्षा घेतल्या जात होत्या. मात्र आता दीर्घकाळ निष्क्रिय असलेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा बंद करून परीक्षा यंत्रणा अधिक सुसूत्र व अद्ययावत करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) मोठा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमधील (University and affiliated college) तब्बल ३०४ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याचे कायमचे बंद (304 courses permanently closed) केले आहे. यामध्ये जुन्या आणि मागील दोन ते तीन शैक्षणिक वर्षापासून एकाही विद्यार्थ्याची नोंदणी झालेली नाही, अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. याबाबतचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून प्रसिद्ध (Circular issued) केले आहे.
विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, मागील दोन ते तीन वर्षांत एकही विद्यार्थी नोंदणी न झालेल्या १२५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा निष्क्रिय घोषित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी अभावामुळे या परीक्षा यापुढे नियमितपणे घेतल्या जाणार नाहीत. या १२५ परीक्षांमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या २३ परीक्षा, मानवविज्ञान विद्याशाखेच्या १५ परीक्षा, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाच्या ४२ परीक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या ४५ परीक्षांचा समावेश आहे.
शून्य नोंदणीमुळे बंद करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमांबाबत एक महत्त्वाची अट विद्यापीठाने स्पष्ट केली आहे. भविष्यात जर कोणत्याही संलग्न महाविद्यालय किंवा संस्थेकडून या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी नोंदणीचा अधिकृत प्रस्ताव प्राप्त झाला, तर फक्त त्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुन्हा घेतल्या जातील. अशा परिस्थितीत परीक्षा कार्यक्रम जाहीर करणे, प्रश्नपत्रिका निर्मिती, परीक्षक नियुक्ती आणि इतर सर्व परीक्षा प्रक्रिया विद्यापीठाच्या नियमांनुसार पुन्हा कार्यान्वित करण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अभ्यासक्रम बंद होऊन दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या १७९ अभ्यासक्रमांच्या परीक्षा यापुढे कोणत्याही परिस्थितीत घेतल्या जाणार नाहीत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे. या कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या १० परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या ८६ परीक्षा, मानवविज्ञान विद्याशाखेच्या ३८ परीक्षा, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाच्या ४५ परीक्षा यांचा समावेश आहे.
मुंबई विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रम कालांतराने विद्यार्थी संख्येअभावी बंद पडले, तर काही अभ्यासक्रमांचे स्वरूप बदलले. आतापर्यंत अशा अभ्यासक्रमांमध्ये पूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून परीक्षा घेतल्या जात होत्या. मात्र आता दीर्घकाळ निष्क्रिय असलेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा बंद करून परीक्षा यंत्रणा अधिक सुसूत्र व अद्ययावत करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे परीक्षा व्यवस्थापनावरचा ताण कमी होणार असून, चालू आणि मागणी अभ्यासक्रमांवर अधिक प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.