केवळ बी.ए, बी.कॉम पदव्या घेवून विद्यार्थी स्पर्धेत टिकणार नाहीत : राधाकृष्ण विखे पाटील
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर येथील उपकेंद्राच्या प्रसंगी राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान आपल्या सर्वांपुढे आहे. त्यासाठी आता विद्यापीठांबरोबरच महाविद्यालयांनीही पुढाकार घ्यावा. आता शिक्षणाच्या सर्व परिभाषा बदलल्या आहेत. एकाच वेळी अनेक विद्याशाखांचे ज्ञान संपादन करण्याची प्रक्रीया गतीने पुढे जात आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाही मागे राहुन चालणार नाही. कारण केवळ बी.ए, बी.कॉम सारख्या तत्सम पदव्या घेवून विद्यार्थी आता स्पर्धेत टिकू शकणार नाही.असे मत राज्याचे महसूल तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर येथील उपकेंद्राच्या प्रसंगी राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमास ऑनलाईन प्रणालीव्दारे उपस्थिती लावली. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, जिल्हा बॅकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी, प्र.कुलगुरु डॉ.पराग काळकर , विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र विखे पाटील, डॉ. देविदास वायदंडे,डी. बी. पवार, प्र. कुलसचिव डॉ विजय खरे, यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये कौशल्य शिक्षणाला दिलेले प्राधान्य विचारात घेवून औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याचे काम विद्यापीठाच्या उपकेंद्रातून व्हावे, यासाठी या पदवी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तांत्रिक शिक्षणही कसे घेता येईल याचाही विचार व्हावा. तसेच शिक्षण व्यवस्थेमध्ये कोचिंग क्लासचा वाढलेला हस्तक्षेप हे व्यवस्थेच अपयश आहे. या कोचिंग क्लासवर आपण कुठलेही नियंत्रण आणू शकलो नाही. महाविद्यालयात येणारा विद्यार्थी या कोचिंग क्लासकडे का वळाला? याचे आत्मपरिक्षण करण्याची गरजही विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपकेंद्राच्या इमारतीची निर्मिती ही स्व.दादा पाटील शेळके यांची स्वप्नपुर्ती असून २५ वर्षे न सुटलेला प्रश्न हा मागील दोन वर्षात मार्गी लागला. या उपकेंद्राच्या इमारतीमुळे गावाचे अन्य प्रश्नही सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी यांनी विद्यापीठ येथे कौशल विकासवर आधारित अभ्यासक्रम चालवेल आणि रोजगार भिमुख शिक्षण देईल अशी भूमिका विषद केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राजेंद्र विखे पाटील यांनीही केले. तर आभार प्र. कुलसचिव डॉ विजय खरे यांनी मानले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिनेट सदस्य सचिन गोर्डे पाटील यांनी केले.
कोट –
विद्यापीठाच्या विस्तारासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून ५ कोटी रुपयांचा निधी तसेच ई-बस उपलब्ध करुन देण्याची केलेली मागणी मंत्री विखे पाटील यांनी मान्य करुन, या उपकेंद्राकडे येणा-या रस्त्याचे रुंदीकरण व विद्युतीकरणासाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.