21 जूनचा NEET पेपर 10 लाखांत विकल्याचा दावा; पोलिसांत तक्रार दाखल
अहमदाबादमधील विद्यार्थी शुभम बिरेन ठक्कर यांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. त्यांच्या मते, टेलिग्रामवरील काही ग्रुप्स आणि चॅनेल्समध्ये विद्यार्थ्यांना ‘री-नीट पेपर लीक’ झाल्याचे प्रलोभन दिले जाते. मुख्य ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी २०० ते ५०० रुपये ‘टोकन’ घेतले जातात.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नीट यूजी २०२६ च्या (NEET UG 2026) मूळ परीक्षेच्या पेपर फुटीच्या धक्क्यातून विद्यार्थी आणि पालक अजून सावरले नसतानाच, फेरपरीक्षेच्या नावाने एक मोठा सायबर घोटाळा (Cyber Scam) समोर आला आहे. २१ जूनला होणाऱ्या री-नीट परीक्षेचा (Re-NEET Exam) पेपर १० लाख रुपयांत टेलिग्रामवर विकला (The paper was sold on Telegram) जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अहमदाबाद सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल झाली आहे.
अहमदाबादमधील विद्यार्थी शुभम बिरेन ठक्कर यांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. त्यांच्या मते, टेलिग्रामवरील काही ग्रुप्स आणि चॅनेल्समध्ये विद्यार्थ्यांना ‘री-नीट पेपर लीक’ झाल्याचे प्रलोभन दिले जाते. मुख्य ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी २०० ते ५०० रुपये ‘टोकन’ घेतले जातात. नंतर अॅडमिनकडून खास मीटिंग घेतली जाते. पेपर मिळवण्यासाठी सुरुवातीला ६० हजार रुपये घेतले जातात आणि नंतर पूर्ण रकम १० लाख रुपये मागितली जाते. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँक अकाउंट सापडू नये म्हणून विशेष अॅप्लिकेशन्स आणि QR कोडचा वापर केला जातो.
‘राघव सर’ नावाच्या चॅनेलद्वारे हे नेटवर्क चालवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. शुभम ठाकर यांच्या तक्रारीनुसार, या गँगने आतापर्यंत सुमारे ७,९०१ विद्यार्थी-पालकांकडून ५ कोटी ७४ लाख रुपयांची उकळी केली असल्याचा संशय आहे. २१ जूनच्या परीक्षेपूर्वी पेपर देण्याचे आश्वासन दिले जाते. शुभम यांना धमकीवजा इशारेही देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
३ मे रोजी झालेल्या मूळ नीट परीक्षेनंतर CBI ने मोठ्या प्रमाणात अटका केल्या आहेत. तरीही फेरपरीक्षेच्या पेपर लीकच्या अफवा पसरवून विद्यार्थ्यांच्या असुरक्षिततेचा फायदा घेतला जात आहे. हा प्रकार केवळ फसवणूक आहे की, यामागे पूर्वनियोजित कट आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे. NTA आणि तपास यंत्रणांनी या मास्टरमाईंडपर्यंत पोहोचून कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे. विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या घोटाळ्यामुळे परीक्षा प्रणालीवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत झाला आहे.