11th Admission : दुसऱ्या फेरीसाठी ६ जूनपासून नोंदणी सुरू; १३ जूनला दुसरी गुणवत्ता यादी
आज ६ जून पासून विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज अनलॉक केले जातील. सर्व विद्यार्थ्यांनी आपला अर्ज पुन्हा काळजीपूर्वक तपासून, आवश्यक दुरुस्त्या करून तो लॉक करणे बंधनकारक आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी ६ जून ते ९ जून या कालावधीत नवीन नोंदणीची संधी उपलब्ध आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या (11th Admission Process) पहिल्या फेरीनंतर शिक्षण संचालनालयाने (DSE) दुसऱ्या फेरीचे (Second Round) अधिकृत वेळापत्रक जाहीर (Schedule announced) केले आहे. पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या किंवा नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही फेरी महत्त्वाची ठरेल. आज शनिवार, ६ जून २०२६ पासून दुसऱ्या फेरीसाठी अर्ज नोंदणी आणि दुरुस्ती प्रक्रिया सुरू होत आहे. संचालनालयाने (Directorate of Education) अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली आहे.
आज ६ जून पासून विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज अनलॉक केले जातील. सर्व विद्यार्थ्यांनी आपला अर्ज पुन्हा काळजीपूर्वक तपासून, आवश्यक दुरुस्त्या करून तो लॉक करणे बंधनकारक आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी ६ जून ते ९ जून या कालावधीत नवीन नोंदणीची संधी उपलब्ध आहे. १३ जून रोजी सकाळी ११ वाजता दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर १३ जून दुपारी १२ वाजेपासून ते १६ जून सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल.
ही फेरी पहिल्या फेरीत संधी न मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’ ठरेल. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत अर्ज भरता आला नाही किंवा तांत्रिक अडचणी आल्या, त्यांना आता पूर्ण संधी मिळणार आहे. अर्जात पसंतीक्रम (प्रेफरन्स) नोंदवणे, कॉलेज आणि स्ट्रीम निवड यात बदल करण्याची मुभा या फेरीत दिली गेली आहे. मात्र, अंतिम लॉकिंगनंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
दुसऱ्या फेरीनंतरही आणखीन काही फेऱ्या होणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे संचालनालयाचे आवाहन आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांनी अधिकृत सूचना लक्षात ठेवाव्यात. ही फेरी हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी निर्णायक ठरणार आहे.