TET परीक्षेतील 'या'उत्तरांना गुण दिले जाणार नाही; परीक्षा केंद्रावर बूट घालण्यास बंदी, नव्या सूचना
उत्तरपत्रिकेवर दिलेल्या योग्य पद्धतीनुसार अचूक उत्तर नोंदवावे. अयोग्य पद्धतीने नोंदविलेले उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही. अर्धवट गिरविले गोल, खाडाखोड किंवा एकाच प्रश्नासाठी दोन गोल गिरविलेले असतील, तर अशी उत्तरे तपासली जाणार नाहीत व त्यांना गुण दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या 28 जून रोजी घेतल्या जाणाऱ्या टीईटी परीक्षे संदर्भात सविस्तर नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही प्रकारच्या बोटांना (shoes & socks)वर्ग खोल्यांमध्ये परवानगी असणार नाही चप्पल स्लीपर सॅंडल व इतर हलके फुटवेअर परीक्षार्थींनी घालून यावेत. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रश्नाचे पर्यायांपैकी कोणते तरी एक उत्तर बरोबर आहे. एकदा गिरवलेला पर्याय बदलता येणार नाही, आधी नोंदवलेले उत्तर पुसण्यासाठी खोड रबर, ब्लेड किंवा व्हाइटनर चा उपयोग करू नये, अशा उत्तरांना गुण दिले जाणार नाहीत, असे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी स्पष्ट केले आहे.
परीक्षा परिषदेतर्फे टी टी परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आली असून परीक्षे दरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये याबाबत विशेष काळजी घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर येताना कोणत्या नियमांचे पालन करावे या संदर्भातील सविस्तर यादीच परीक्षा परिषदेतर्फे जाहीर करण्यात आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या सूचना:
1. परीक्षा केंद्रावरील उपस्थिती करिता निर्धारित केलेल्या वेळेस उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
2. परीक्षा परिषदेच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश पत्र परीक्षेच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा परीक्षेस प्रवेश नाकारला जाईल.
3. उमेदवारांची तपासणी झडती (Frisking), ओळख पडताळणी करणे, हजेरी नोंदविणे, सूचना देणे, इत्यादी स्वरूपाच्या कार्यवाहीसाठी परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
4. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी, वाहतूक समस्या, आंदोलने, मोर्चा, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
5. परीक्षा कक्षामध्ये प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात परीक्षा परिषदेची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
6. परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनाधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय नाही.
7. परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याकरिता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खाजगी वाहनांच्या पार्किंग करिता केंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.
8. परीक्षेवेळी मद्य किंवा/आणि मादक अमली पदार्थांचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच अशा उमेदवारांवर परीक्षा परिषदेच्या स्वेच्छाधिकारनुसार परिषदेमार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडीकरिता प्रतीरोधित करण्यात येईल.

9. पडताळणी/ तपासणी संदर्भातील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे.
10. परीक्षेच्या वेळी ओळखीच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स.
11. परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र आणि वर नमूद पाच वैध ओळखपत्रांपैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र व त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल.
12. मूळ ओळखपत्राच्या पुराव्या ऐवजी केवळ त्याच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व उमेदवारास प्रवेश नाकारण्यात येईल.
13. उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर स्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत पेपरच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.
14. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDIA) च्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले ई-आधार सादर करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ई-आधार वर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशीला सह आधार निर्मितीचा दिनांक (Date of Aadhar Generation) व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंटमध्ये आधार डाऊनलोड केलेले असल्यासच ई-आधार वैध मानण्यात येईल.
15). नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला, विवाहित स्त्रियांच्या बाबतीत नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
16). परीक्षा कक्षामध्ये फक्त खालील साहित्य घेऊन जाण्यास परवानगी राहील :-
अ). परीक्षा परिषदेच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले सुस्पष्ट स्वरूपातील प्रवेश पत्र,
ब). काळ्या /निळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन,
क). मूळ वैध ओळखपत्र,
ड). मूळ वैध ओळखपत्राची सुस्पष्ट छायांकित प्रत,
ई). पाण्याची पारदर्शक बॉटल,
17). परवानगी नसलेले अन्य कोणतेही साहित्य (पाऊच, बॅग, पर्स, नोट्स, पुस्तक, लेखन पॅड इत्यादी) परीक्षा कक्षामध्ये नेण्यास सक्त मनाई आहे.
18). कोणत्याही प्रकारचे बुटांना (Shoes & Socks) वर्ग खोलीमध्ये परवानगी असणार नाही. उघडे पादत्राणे जसे की चप्पल, स्लीपर, सँडल व इतर हलके फुटवेअर घालावेत.
19). दिव्यांग उमेदवारांनी आवश्यक प्रपत्रे भरून https://mahatet.in या संकेतस्थळावर उमेदवाराने स्वतःच्या लॉगिनमधून अपलोड करणे अनिवार्य आहे. संकेतस्थळावर फक्त 'प्रपत्र तीन' अपलोड करावे व प्रपत्र तीन अपलोड करण्याची सुविधा त्याच उमेदवारांना आहे, ज्या उमेदवारांनी लेखनिक / मदतनीस ची मागणी आवेदन पत्र भरताना केलेली आहे. तसेच सदरील प्रपत्रे उमेदवाराने परीक्षेच्या दिवशी समवेक्षक /केंद्र संचालक यांच्याकडे जमा करावीत. तथापि आवश्यक कागदपत्रांव्यतिरिक्त इतर कोणतेही कागदपत्र परीक्षा कक्षामध्ये घेऊन गेल्यास परीक्षा परिषदेच्या सूचनांचे उल्लंघन समजून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
20). उमेदवारांनी पेपर। व ।। साठी नोंदणी केलेली आहे, त्या उमेदवारांना दोन प्रवेश पत्र देण्यात आलेली आहेत आणि दोन्ही पेपरचे बैठक क्रमांक देखील वेगवेगळे असणार आहेत.
21). परीक्षार्थीने आपला बैठक क्रमांक नमूद असलेली उत्तरपत्रिका (OMR) प्राप्त झाल्याची खात्री करावी. उत्तर पत्रिकेवरील माहिती व उत्तरे नोंदविण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचाच वापर करावा.
22). उत्तरपत्रिकेवर परीक्षा दालनात प्राप्त प्रश्नपत्रिकाचा संच कोड (A/B/C/D) अचूक नोंदवावा व त्या समोरील संबंधित गोल अचूक गिरवावा.
23). उत्तरपत्रिकेवर दिलेल्या योग्य पद्धतीनुसार अचूक उत्तर नोंदवावे. अयोग्य पद्धतीने नोंदविलेले उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही. अर्धवट गिरविले गोल, खाडाखोड किंवा एकाच प्रश्नासाठी दोन गोल गिरविलेले असतील, तर अशी उत्तरे तपासली जाणार नाहीत व त्यांना गुण दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
24). प्रत्येक प्रश्नाचे पर्यायांपैकी कोणतेतरी एक उत्तर बरोबर आहे. एकदा गिरवलेला पर्याय बदलता येणार नाही. आधी नोंदविलेले उत्तर पुसण्यासाठी खोड रबर, ब्लेड किंवा व्हाइटनर चा उपयोग करू नये. अशा उत्तरास गुण दिले जाणार नाहीत.
25). परीक्षेची वेळ संपताच सोडविलेल्या आणि न सोडविलेल्या प्रश्नांची संख्या अंकात उत्तरपत्रिकेवर दिलेल्या चौकटीत अचूक नोंदविणे बंधनकारक आहे.
26). उमेदवाराने परीक्षा कालावधी संपल्यानंतर मूळ उत्तर पत्रिका समवेक्षकांकडे देऊन कार्बन प्रत (तिसरी प्रत) स्वतःकडे घ्यावी व तशी स्वाक्षरी स्वाक्षरीपटावर करावी. तसेच परीक्षा संपल्यानंतर समवेक्षकांच्या सूचने शिवाय परीक्षा दालन सोडू नये.
27). प्रश्नपत्रिकेत कोणत्याही प्रश्नांच्या उत्तराची नोंद करू नये. प्रश्नपत्रिकेचे कोणतेही पृष्ठभाग मूळ प्रश्नपत्रिकेपासून वेगळे करू नये.
28). महिला उमेदवारांना कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी किंवा बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य राहील. तथापि Live CCTV मध्ये सर्व उमेदवारांचे चेहरे स्पष्ट दिसावेत, यासाठी परीक्षा कालावधीत वर्गखोलीत मानेच्या वर म्हणजेच कानावर, डोक्यावर किंवा चेहरा / तोंडावर कोणत्याही प्रकारचा कपडा आवरण असता कामा नये.