'या' राज्यातील विद्यापीठांमध्ये बंद; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची होतीय मागणी
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया एसएफआय ने पश्चिम बंगालमधील विविध विद्यापीठांमध्ये संपाची हाक दिली आहे. ज्यामध्ये ते शिक्षण मंत्री ब्रात्य बसू यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या बंदला प्राध्यापक आणि विद्यार्थी दोघांकडून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
मंत्री ब्रात्य बसू विद्यापीठातून बाहेर पडत असताना १ मार्च रोजी जाधवपूर विद्यापीठात ही घटना घडली. विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांबाबत विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली होती. यावेळी बसू यांचे मंत्री आणि विद्यार्थी यांच्यात वाद झाला. या घटनेचा निषेध करणार्या दोन विद्यार्थ्यांना मंत्र्यांच्या गाडीची धडक बसून दोन विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी एकाला गंभीर दुखापत झाली.
एसएफआयचे राज्य समिती सदस्य सुभाजित सरकार यांनी आरोप केला की, तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) आश्रय दिलेल्या बाहेरील लोकांनी जाधवपूर विद्यापीठात हिंसाचार आणि तोडफोड केली. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणमंत्र्यांशी बोलायचे होते, परंतु मंत्र्यांनी कोणतीही चर्चा न करता कॅम्पसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे ही हिंसाचार झाला.