कोणी निकाल सांगत का निकाल...? दहावीच्या विद्यार्थिनीच्या पालकाची आर्त हाक..
कोणताही गैरप्रकार किंवा परीक्षेच्या नियमांचा भंग केलेला नसताना शेकडो विद्यार्थ्यांचा निकाल राज्य मंडळाने राखीव ठेवला. निकाल पाहता येत नसल्यामुळे विद्यार्थी सध्या तणावाखाली आहेत. त्यांचे पालकही हदबल आहेत. अजूनही अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता आला नाही.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला त्यात 119 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले. लाखो विद्यार्थी आपल्याला मिळालेल्या गुणांमध्ये गुण पाहून आनंदी आहेत. पालकही त्यांच्या आनंदात सहभागी असून राज्यभर जल्लोष सुरू आहे. मात्र, मुंबई विभागीय मंडळातून परीक्षा दिलेली आकांक्षा नाईक ही विद्यार्थिनी अजूनही आपला ऑनलाईन निकाल पाहू शकली नाही. "बाबा सर्वांचा निकाल लागला माझा निकाल का नाही लागला. सर्व मैत्रिणी पाहुणे विचारत आहेत, त्यांना काय उत्तर द्यायचे",असा प्रश्न आकांक्षा आपल्या वडिलांना विचारत आहे. त्यावर कोणी माझ्या मुलीचा निकाल सांगता का निकाल... अशी आर्त विनंती आकांक्षाचे वडील विजय नाईक करत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 8 मे रोजी इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. मात्र अजूनही अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता आला नाही. पुणे विभागीय मंडळात 117 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना मोबाईलवरून व्हाट्सअप वर ऑफलाइन पद्धतीने निकाल सांगावा लागला. त्यामुळे राज्य मंडळातील कर्मचाऱ्यांना निकालाच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत कार्यालयात बसून काम करावे लागले.
कॉपी केस, परीक्षे दरम्यान गैरप्रकार किंवा इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला जाऊ शकतो. मात्र कोणताही गैरप्रकार किंवा परीक्षेच्या नियमांचा भंग केलेला नसताना शेकडो विद्यार्थ्यांचा निकाल राज्य मंडळाने राखीव ठेवला. निकाल पाहता येत नसल्यामुळे विद्यार्थी सध्या तणावाखाली आहेत. त्यांचे पालकही हदबल आहेत. शाळेकडे याबाबत संपर्क साधला असता शाळेकडेही या संदर्भातील कोणतेही उत्तर नसल्यामुळे आता काय करावे, असा पालकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
आकांक्षाचे पालक विजय नाईक 'एज्युवार्ता'शी बोलताना म्हणाले, दहावीचा निकाल 8 मे रोजी जाहीर होणार म्हणून माझी मुलगी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून मोबाईल हातात घेऊन बसली होती. परंतु दिवसभर तिला निकाल दिसलाच नाही. वेगवेगळ्या वेबसाईटवर रिझल्ट रिझर्व अशी विंडो डिस्प्ले होत होती. माझी मुलगी हुशार आहे.तिच्या सर्व मैत्रिणी, आमचे पाहुणे सर्व तिला निकाल विचारत आहेत. पण अजूनही तिला दहावीत किती गुण मिळाले हे आम्हाला समजू शकले नाही. काल पासून तिने जेवण केले नाही. आम्ही सर्व तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. निकालात काही एरर असल्याने निकाल लागला नसेल असे तिच्या शाळेतील शिक्षक सांगत आहेत. पण विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना त्यांचा निकाल राखून ठेवला आणि आपण नापास आहोत, त्यामुळे निकाल राखून ठेवला, असा समज करून घेत त्यांनी काही चुकीचे पाऊल उचलले तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे माझ्या मुलीचा निकाल लवकर पहायला मिळावा, यासाठी मी व माझे नातेवाईक शाळा व बोर्डाकडे सातत्याने विचारणा करत आहे.