अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज भरला का? ही कागदपत्र काढून ठेवा, शिक्षण विभागाच्या सूचना
मागील वर्षी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अधिक पारदर्शकता व सुलभता मिळावी यासाठी ही प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करून अर्ज भरणे आवश्यक आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून राज्यातील सर्व राज्य मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी आवश्यक कागदपत्रे काढून ठेवावीत, असे आवाहन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्यांना एक ते दहा कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम निवडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मागील वर्षी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अधिक पारदर्शकता व सुलभता मिळावी यासाठी ही प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करून अर्ज भरणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेनुसार म्हणजेच मेरिटनुसार राबवली जाणार आहे. कॅप व कोटा अशा दोन्ही पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. प्रवेशासाठी आवश्यक सर्व माहिती शाखा उपलब्ध जागा इत्यादी ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे.
प्रवेश प्रक्रिया राबविताना प्रथमतः विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यात प्रवेश अर्जाचा पहिला भाग व त्याची पडताळणी केली जाईल प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांची निवड करता येईल. प्रवेश फेरीत मिळालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करावा लागेल. प्रवेश प्रक्रियेत शासनाच्या नियमानुसार सर्व आरक्षणे लागू राहतील. तसेच इनहाऊस कोटा व्यवस्थापन कोटा अल्पसंख्यांक कोटा याचाही समावेश असेल.
विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस पात्रता प्रमाणपत्र , दिव्यांग प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या प्रवेशासाठी पालकांचा बदली आदेश व रुजू अहवाल, संरक्षण दल किंवा माजी सैनिकांच्या मुलांसाठी आवश्यक प्रमाणपत्र, क्रीडापटू असल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे प्रमाणपत्र, अनाथ विद्यार्थी असल्यास महिला व बालकल्याण विभागाचे प्रमाणपत्र ही कागदपत्र विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध करून ठेवणे आवश्यक आहे,असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.