MPSC पेपरफुटी प्रकरणी भव्य मोर्चा; अध्यक्षांच्या राजीनाम्यासह स्वतंत्र चौकशीची मागणी

विद्यार्थ्यांनी गोपनीय कक्षात कार्यरत असलेल्या आरोपी अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात झालेल्या MPSC परीक्षांचे स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय सेवाकाळाची, पदोन्नतीची प्रक्रिया आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या निकषांची सखोल चौकशी करून माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

MPSC पेपरफुटी प्रकरणी भव्य मोर्चा; अध्यक्षांच्या राजीनाम्यासह स्वतंत्र चौकशीची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पुण्यात भव्य मोर्चा काढला.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह इतरही विद्यार्थी व पालक तसेच राजकीय पक्षाचे नेते या मोर्चात सहभागी झाले.मोर्चानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी, तसेच मुंबई क्राईम ब्रँचकडून आयोगाला सुपुर्द करण्यात आलेला प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

राज्यातील लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असून परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास हा आयोगाच्या कार्यपद्धतीचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र, औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी आयोगातील काही अधिकाऱ्यांना अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहेत. दरम्यान,पुण्यातील मोर्चाच्या सुरूवातीला आमदार रोहित पवार,आमदार विश्वजीत कदम, करिअर मार्गदर्शक विठ्ठल कांगणे यांच्यासह विविध वक्त्यांनी या मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांना संबोधित केले.त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अक्षय जैन,नितीन आंधळे, अक्षय कांबळे, राहुल ससाणे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी गोपनीय कक्षात कार्यरत असलेल्या आरोपी अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात झालेल्या MPSC परीक्षांचे स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय सेवाकाळाची, पदोन्नतीची प्रक्रिया आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या निकषांची सखोल चौकशी करून माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पेपरफुटी प्रकरणात आणखी कोणते एजंट किंवा व्यक्ती सहभागी आहेत, याचा तपास करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. संशयित पेपर विक्री नेटवर्काचा आर्थिक व्यवहार, कॉल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे आणि संपर्क साखळी तपासण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

MPSC मार्फत घेण्यात आलेल्या अन्य काही परीक्षांच्या निकालांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांची दखल घेऊन स्वतंत्र चौकशी सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. गट-ब परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर MPSC ने आठ दिवसांत स्पष्टीकरण द्यावे आणि कोणताही गैरप्रकार झाला आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ आणि कृषिसेवा परीक्षेतील वर्णनात्मक उत्तरपत्रिका तपासणीदरम्यान निदर्शनास येत असलेल्या कथित मानवी चुकांची चौकशी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. याशिवाय उत्पादन शुल्क विभागीय परीक्षा आणि पोलीस उपनिरीक्षक विभागीय परीक्षेतील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तपास प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम राहण्यासाठी तपासातील महत्त्वाच्या घडामोडी आणि निष्कर्ष वेळोवेळी सार्वजनिक करण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

“विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांमुळे त्यांच्या भवित्यावर परिणाम होऊ नये. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन दिलासा द्यावा,” अशी भूमिका निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांनी मांडली.
-----------------------------------------

MPSC परीक्षेतील घोटाळे आणि पेपरफुटीच्या विरोधात आज पुण्याच्या रस्त्यांवर हजारो विद्यार्थ्यांचा जनसागर संतापाने उतरला आहे. वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेला आता रोखणे गरजेचे आहे. राज्य सरकारने MPSC आयोगाचे अध्यक्ष आणि जबाबदार अधिकाऱ्यांचे तात्काळ राजीनामे घेऊन संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करावी. तसेच या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात पार पडलेल्या मागील सर्व परीक्षांची सखोल चौकशी झालीच पाहिजे. जर सरकारने या मागण्या त्वरित मान्य केल्या नाहीत, तर येत्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात दिल्लीच्या 'जंतर-मंतर'सारखी परिस्थिती निर्माण होईल आणि लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरून व्यवस्थेला जाब विचारतील.
​– नितीन आंधळे ,
विद्यार्थी प्रतिनिधी तथा आयोजक- विद्यार्थी आंदोलन
-----------------------------------
तरुणांच्या हातात प्रश्नपत्रिका असायला हव्यात, पण आज त्यांच्या हातात आंदोलनाचे फलक आहेत. पेपरफुटी, परीक्षेतील घोटाळे, निकालातील संशयास्पद बाबी आणि सतत बदलणाऱ्या नियमांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. MPSCला एकच प्रश्न परीक्षा घेण्यासाठी आयोग आहे की विद्यार्थ्यांची सहनशक्ती तपासण्यासाठी? आम्हाला आश्वासनांची नाही, उत्तरांची आणि जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. परीक्षेतील पारदर्शकता, पेपरफुटीवर कठोर कारवाई, दोषींवर गुन्हे दाखल करणे, संशयास्पद निकालांची निष्पक्ष चौकशी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित सर्व प्रश्नांवर तातडीने निर्णय झाला पाहिजे.
- अक्षय जैन, अध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस (प्रसारमाध्यम विभाग)