साखर झोपेत गडचिरोली आश्रमशाळेत सर्पदंशाने ३ विद्यार्थिनींचा मृत्यू; ३ जणींची प्रकृती गंभीर

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात ९ ऑगस्ट रोजी आणि ऐन जागतिक आदिवासी दिनाच्या रात्री एक हृदयद्रावक घटना घडली आहे. विद्यार्थिनी जेवणानंतर झोपल्या असताना सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास विषारी सापाने त्यांना दंश केला.

साखर झोपेत गडचिरोली आश्रमशाळेत सर्पदंशाने ३ विद्यार्थिनींचा मृत्यू; ३ जणींची प्रकृती गंभीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गडचिरोली जिल्ह्यातील (Snakebite in Gadchiroli District)  धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात (Aided Ashram School Hostel) ९ ऑगस्ट रोजी आणि ऐन जागतिक आदिवासी दिनाच्या रात्री एक हृदयद्रावक घटना घडली आहे. विद्यार्थिनी जेवणानंतर झोपल्या असताना सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास विषारी सापाने त्यांना दंश (Poisonous snakebite at an ashram school) केला. सहा मुलींना सर्पदंश झाला, त्यापैकी तीन मुलींना (Death of three girls in Gadchiroli) उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले. तर तीन विद्यार्थीनीची प्रकृती अधिक गंभीर असल्याची माहिती आहे. 

मृत विद्यार्थिनींची नावे सुश्मिता सरोजित मंडल (१४), दीपिका एतवा लकडा (१२) आणि अनु गजुराम कोरेटी (८) अशी आहेत. दीपिका आणि सुश्मिता यांचा धानोरा रुग्णालयात तर अनुचा गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दीपिका बिटलूरसाय मडावी (११), समृद्धी सुरेश नैताम (१४) आणि कविता राजकुमार किरंगा (१२) यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. समृद्धीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. 

खाटा उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थिनी जमिनीवर गादी टाकून झोपत होत्या. वसतिगृहातील महिला अधीक्षक घटना घडताना गैरहजर होत्या, अशी माहिती समोर आली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत वारंवार मागण्या करूनही सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचे आरोप होत आहेत. यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

जिल्हा प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून आदिवासी विकास आयुक्तालयाच्या नाशिक व नागपूर येथील पथकांनी घटनास्थळी पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  गडचिरोलीचे पालकमंत्री यांनीही माहिती मागवली आहे. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी शोक व्यक्त करत उपचाराधीन मुलींना सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

ही घटना आदिवासी आश्रमशाळांमधील मूलभूत सुविधा आणि सुरक्षिततेच्या कमतरतेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधते. दोषींवर कारवाई करून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे, अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे. पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा आणि अशा दुर्घटना भविष्यात टाळल्या जाव्यात, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.