पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवण्याची मुदत १३ ऑगस्टपर्यंत वाढवली; तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना दिलासा
महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तब्बल पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरु झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र मोठ्या संख्येने उमेदवार एकाच वेळी पोर्टलवर लॉगिन करत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची (Maharashtra Teacher Recruitment 2026) प्रतीक्षा करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तब्बल पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरु झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदविण्याची (Pavitra Portal Preference Registration) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र मोठ्या संख्येने उमेदवार एकाच वेळी पोर्टलवर लॉगिन करत असल्याने तांत्रिक अडचणी (Pavitra Portal technical issue) निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने उमेदवारांना दिलासा देत प्राधान्यक्रम लॉक (Teacher recruitment priority lock) करण्यासाठीची मुदत १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवली आहे.
पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवताना काही उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार विषय आणि पदांची पसंती उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. काही उमेदवारांच्या बाबतीत पोर्टलवरील माहिती व्यवस्थित दिसत नसल्याच्या तक्रारीही आहेत. त्याचबरोबर पोर्टलवर मोठ्या प्रमाणात लोड असल्यामुळे OTP मिळण्यास विलंब होत असल्याची समस्या अनेक उमेदवारांना जाणवत आहे. यापूर्वी शिक्षण विभागाने प्राधान्यक्रम नोंदवून लॉक करण्यासाठी ६ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२६ असा कालावधी दिला होता.

मात्र पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि वेबसाइटवरील वाढता लोड लक्षात घेऊन ही मुदत आता १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान दोन दिवसांची मुदतवाढ पुरेशी नसून किमान एक आठवड्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिक्षक भरतीच्या उमेदवारांसह विविध शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे शिक्षण विभागाने मान्य केले आहे.
शिक्षण विभागाने यासंदर्भात पत्रक जारी करून OTP न मिळाल्यास उमेदवारांनी काय करावे, याबाबत सूचना दिल्या आहेत. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत ७६ हजार ३९४ मुलाखतीशिवाय आणि ५६ हजार २०६ मुलाखतीसह उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट झाले आहेत. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेत मोठ्या संख्येने उमेदवार सहभागी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
उमेदवारांनी पोर्टलवरील तांत्रिक समस्या लक्षात घेऊन उपलब्ध मुदतीत प्राधान्यक्रम नोंदवण्याची आणि लॉक करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून भरती प्रक्रिया वेळेवर पुढे जाईल.