दहावीच्या उत्तरपत्रिकांची चोरी, मास्टरमाईंड गटशिक्षण अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात 

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्गी येथील सीताबाई संगई विद्यालयाच्या आवारातील पेपर कस्टडीतून चक्क दहावी इंग्रजी विषयाच्या दोन उत्तरपत्रिका चोरून त्या बाहेर दोन संबंधित विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यात आल्या.

दहावीच्या उत्तरपत्रिकांची चोरी, मास्टरमाईंड गटशिक्षण अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्गी येथील सीताबाई संगई विद्यालयाच्या (Sitabai Sangai School) आवारातील पेपर कस्टडीतून चक्क दहावी इंग्रजी विषयाच्या (10th English Subject) दोन उत्तरपत्रिका चोरून (Theft of answer sheets) त्या बाहेर दोन संबंधित विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यात आल्या. पेपर संपल्यानंतर त्या उत्तरपत्रिका कस्टडीत जमा करवून न घेता त्या मजुराद्वारे बाहेर पाठविण्यात आल्या, त्या बाहेरच लिहून पुन्हा गठ्ठयात टाकत असताना भरारी पथक आल्याने तो कट उधळला गेला, असा धक्कादायक घटनाक्रम समोर आला आहे. प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी सुशिल अभ्यंकर (Extension Officer Sushil Abhyankar) हा या कटाचा मास्टरमाईंड निघाला आहे.

अभ्यंकर यानेच संबंधित दोन परिक्षार्थीच्या उत्तरपत्रिका कामगार अनिल हाडोळेला दिल्या. त्या हाडोळेने विद्यार्थ्यांकडून लिहून परतही आणल्या. मात्र त्याचवेळी भरारी पथकातील उपशिक्षणाधिकारी त्याला दिसल्याने तो त्या उत्तरपत्रिका सब कस्टोडियन असलेल्या सुशील अभ्यंकरजवळ देऊ शकला नाही. उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते यांनी त्याच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. त्यावेळी त्याने पँटमध्ये खोसलेल्या दोन उत्तरपत्रिका काढून दिल्या. हाडोळेसह प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे याला १ मार्च रोजी पहाटे अटक केल्यानंतर ही उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले

निवृत्तीकडे झुकलेल्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी खोडे यांना काही वर्षांपूर्वी आदर्श शिक्षक, अधिकारी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता त्यांच्यावरच बेजबाबदारीचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर, विषय शिक्षक असलेल्या सुशील अभ्यंकरकडे अंजनगाव पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी पदाचा प्रभार आहे. दुपारी ५ ते ५.३० पर्यंत उत्तरपत्रिका सिलबंद होणे अपेक्षित होते. कस्टडीत उत्तरपत्रिका येताच अभ्यंकरने त्यातील दोन उत्तरपत्रिका हाडोळेला दिल्या. खोडे यांच्या लेटलतिफी त्याला जबाबदार असल्याचे तपासात उघड झाले आहे.

या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार आणि शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोर्डाच्या परीक्षेत अशा प्रकारे सामूहिक गैरप्रकार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने पेपर बाहेर पाठवण्याच्या प्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अशा बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. पोलिस आता त्या दोन 'अनोळखी' विद्यार्थ्यांचा शोध घेत असून, या घोटाळ्याचे धागेदोरे आणखी कोणापर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास एसडीपीओ मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सूरज बोंडे करीत आहेत.