अकरावी प्रवेशाच्या विशेष सहाव्या फेरीसाठी, बुधवारपासून पसंतीक्रम नोंदवता येणार
विद्यार्थ्यांना २१ तारखेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून, त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी सहाव्या विशेष फेरीसह गुणवता यादी जाहीर करण्यात येईल. सहावी विशेष फेरी ही शेवटची विशेष फेरी असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अकरावी प्रवेशासाठी (11th Admission Process 2024-25) सहाव्या विशेष फेरीची घोषणा (Announcement of Sixth Special Round) करण्यात आली असून, येत्या बुधवारपासून विद्यार्थ्यांना यासाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येणार (Preference can be recorded) आहे. विद्यार्थ्यांना २१ तारखेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून, त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी सहाव्या विशेष फेरीसह गुणवता यादी जाहीर करण्यात येईल. सहावी विशेष फेरी ही शेवटची विशेष फेरी असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे.
अकरावी प्रवेशाच्या आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या आणि पाच विशेष फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये दोन लाख ६९ हजार ९७१ विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशाची निश्चिती केली आहे, तर २९ हजारांहून अधिक विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ९० टक्के विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशाची निश्चिती केली आहे. तरीही अकरावी प्रवेशाच्या एक लाखाहून अधिक जागा रिक्त आहेत. या सहाव्या विशेष फेरीमध्ये एटीकेटी सवलत मिळालेले विद्यार्थीही अर्ज करू शकतील.
या फेरीनंतर डेली मेरिट राउंड सुरू होणार असून, त्याचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. यापूर्वी प्रथम प्राधान्य फेरीचे आयोजन करण्यात येत होते. त्यात मोठ्या प्रमाणात अकरावी प्रवेशात गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे प्रथम प्राधान्य फेरी गेल्या वर्षी बंद केली होती. मात्र, आता पुन्हा त्याच धर्तीवर पाचव्या विशेष फेरीनंतर डेली मेरिट राउड (डीएमआर) फेरी होणार आहे. त्यानुसार गुणवत्ता यादी दररोज जाहीर केली जाणार आहे.
आकडेवारीनुसार राज्यात अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे विभागात प्रवेशासाठी १ हजार ७२७ महाविद्यालये उपलब्ध आहेत. या सर्व महाविद्यालयांमध्ये ६ लाख २७ हजार ६७० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ४ लाख ९३ हजार ९०४ विद्यार्थ्यांनीच नोंदणी केलेली आहे. म्हणजे, उपलब्ध जागांच्या १ लाख ३३ हजार ७६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी देखील केली नाही. तर काही विद्यार्थ्यांनी नोंदणी करून भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे आज घडीला राज्यात अकरावी प्रवेशाच्या तब्बल २ लाख २० हजार ६९२ जागा रिक्त आहेत.