प्राध्यापक भरती महिन्याभरात मार्गी लागणार;मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत माहिती
महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांच्या भरती प्रक्रियेस वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. आता कोणत्या महाविद्यालयात विद्यार्थी संख्येचा विचार करता प्राध्यापकांच्या किती जागा रिक्त आहेत. याबाबत आढावा घेऊन विषय निहाय पदे वितरणाची प्रक्रिया येत्या महिन्याभरात पूर्ण केली जाईल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित असून त्यावर केव्हा मार्ग काढला जाणार? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. त्यावर मंगळवारी (दि.९) विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येत्या महिन्याभरात त्यावर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे सांगितले. त्यामुळे प्राध्यापक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.
आमदार जयंत आजगावकर यांनी विधान परिषदेत प्राध्यापकांच्या कॅस संदर्भात व महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांच्या भरती प्रक्रियेस वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. आता प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या विचार करता कोणत्या महाविद्यालयात प्राध्यापकांच्या किती जागा रिक्त आहेत. याबाबत आढावा घेऊन विषय निहाय पदे वितरणाची प्रक्रिया येत्या महिन्याभरात पूर्ण केली जाईल.
विद्यापीठातील विविध पदे भरण्यासाठी माजी राज्यपाल यांच्या आदेशानुसार निकष तयार करण्यात आले होते. परंतु, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या मागणीनंतर त्यात बदल करण्याबाबत सध्याचे राज्यपाल यांच्याशी चर्चा सुरू आहे.७०-३० या सूत्र ऐवजी ६०-४० असे सूत्र ठेवण्यास त्यांनी तयारी दर्शवली आहे. मात्र, भरतीसाठी निकषाचे ५०- ५० चे सूत्र ठेवण्याचा आमचा प्रयत्न असून त्यास लवकरच मान्यता मिळेल. त्यामुळे विद्यापीठातील ७५० प्राध्यापकांच्या भरतीच्या निकषातही बदल होईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.