12 वी च्या परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू;172 परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची केली अदलाबादली

या परीक्षेसाठी 3 हजार 387 मुख्य परीक्षा केंद्र असून त्यातील 172 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे या 172 परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबादली करून त्यांना दुसऱ्या परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात आले आहे.

12 वी च्या परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू;172 परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची केली अदलाबादली

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला येत्या 10 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी 3 हजार 387 मुख्य परीक्षा केंद्र असून त्यातील 172 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे या 172 परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबादली करून त्यांना दुसऱ्या परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात आले आहे. यंदा 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे 25 हजाराने वाढ झाली आहे. 

राज्यातील नव विभागीय मंडळाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राज्य मंडळाचे अध्यक्ष  नंदकुमार बेडसे (अतिरिक्त कार्यभार) यांनी ही माहिती दिली. यावेळी राज्य मंडळाचे सचिव डॉ.दीपक माळी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बेडसे म्हणाले ,दरवर्षीप्रमाणे यंदाही कॉपीमुक्त अभियान राबविले जात असून 248 संवेदनाशील केंद्रांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे काही परीक्षा केंद्रांवर झूम व गुगल मीटच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. राज्यातील 7 लाख 99,773 विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली असून 3 लाख 80 हजार 682 विद्यार्थ्यांनी कला शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तर वाणिज्य शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 20 हजार 152 एवढी आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी 8 लाख 20  हजार 229 मुलांनी तर 7  लाख 12 हजार 240 मुलींनी नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे 18 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे आवश्यक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दहा मिनिटे अधिकचा वेळ दिला जाणार आहे.

12 वी च्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय संख्या 

पुणे 2 लाख 60 हजार 14

 नागपूर 1 लाख 60 हजार 530

 छत्रपती संभाजीनगर 1 लाख 91 हजार 493 

मुंबई 3 लाख 52 हजार 718

 कोल्हापूर 1 लाख 16 हजार 611 

 अमरावती 1 लाख 56 हजार 915 

 नाशिक 1 लाख 73 हजार 651 

 लातूर 96 हजार 542 

कोकण 24 हजार 13