पावनखिंड दौड उपक्रमामुळे विद्यार्थी रमले इतिहासात 

शिवकालीन इतिहासातील ठळक घटना, त्यातील देश प्रेमाची ज्वलंत भावना आणि महाराजां प्रतीचे प्रेम आणि निष्ठा याचे मनोहरी दर्शन विद्यार्थ्यांना होईल. यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणावीकर विद्या मंदिराने या उपक्रमांतर्गत प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या कल्पना राबवल्या.

पावनखिंड दौड उपक्रमामुळे विद्यार्थी रमले इतिहासात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही आपल्या कालसुसंगत शैक्षणिक धोरणांमुळे, समृद्ध इतिहासाशी असलेल्या नात्यामुळे आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रमांमुळे नेहमीच ओळखली जाते. विद्यार्थ्यांना आपल्या दैदिप्यमान इतिहासाची ओळख व्हावी, त्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदराची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने संस्थेच्या रेणावीकर विद्या मंदिरात ‘पावनखिंड दौड’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना, स्वराज्यासाठी दिलेले बलिदान, देशप्रेमाची जाज्वल्य भावना तसेच छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण यांचा प्रेरणादायी परिचय करून देण्यात आला. प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वयोगटानुसार विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावरील माहिती सादरीकरण, पोवाडा गायन, ऐतिहासिक किल्ल्यांची चित्रे संकलित करणे व रेखाटणे, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा, सादरीकरण तसेच शिवकालीन प्रसंगांचे नाट्यीकरण अशा विविध उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अहिल्यानगरच्या ऐतिहासिक वारशाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या हेतूने शहरातील भुईकोट किल्ल्यासह अन्य ऐतिहासिक स्थळांना भेटी आयोजित करण्यात आल्या. भुईकोट किल्ल्यात महाराणी ताराबाई यांना काही काळ नजरकैदेत ठेवण्यात आले होते, तसेच औरंगजेबाचेही येथे काही काळ वास्तव्य होते. या ऐतिहासिक संदर्भांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्थळभेटीद्वारे देण्यात आली. त्यामुळे इतिहासाचे पुनरावलोकन करण्याची आणि वारशाबद्दल अभिमान बाळगण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.

या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड यांचे कल्पक मार्गदर्शन लाभले. तसेच वर्गशिक्षकांनी परिश्रमपूर्वक विविध उपक्रमांचे नियोजन करून विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला. पालकांनीही उत्साहाने सहकार्य करत उपक्रमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दलची आवड, राष्ट्रप्रेम आणि सांस्कृतिक वारशाविषयी अभिमानाची भावना अधिक दृढ झाल्याचे समाधान शाळा प्रशासनाने व्यक्त केले.