ज्ञानमंदिर, कळंबोली येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी प्रवचन
विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा आदर करावा, नियमित अभ्यासाची सवय लावावी आणि चांगले, जबाबदार नागरिक बनण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असा मौल्यवान संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानमंदिर, कळंबोली येथे गुरुपौर्णिमेनिमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा कीर्तनकार ह.भ.प. कु. सामवेद सचिन केलटकर (वय १७) उपस्थित होते. तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संजना बाईत, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि गुरुवंदनेने झाली. यानंतर प्रमुख वक्ते सामवेद केलटकर यांनी भारतीय संस्कृतीतील गुरुचे अनन्यसाधारण स्थान, गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांनी अंगीकारावयाचे शिस्त, प्रामाणिकपणा, परिश्रम, संस्कार आणि आदर्श गुण याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा आदर करावा, नियमित अभ्यासाची सवय लावावी आणि चांगले, जबाबदार नागरिक बनण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असा मौल्यवान संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी शिक्षकांनीही गुरुपौर्णिमेचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये गुरुंबद्दल आदर, कृतज्ञता आणि नैतिक मूल्यांची जाणीव दृढ व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, संस्कारक्षम आणि ज्ञानवर्धक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
--------------
गुरुपौर्णिमेनिमित्त ज्ञानमंदिरमध्ये श्लोक पाठांतर स्पर्धा
म.ए.सो. ज्ञानमंदिर, कळंबोली येथे गुरुपौर्णिमेनिमित्त इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी श्लोक पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन, ईशस्तवन आणि स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे धार्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्व समजावून सांगण्यात आले.स्पर्धेत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी करुणाष्टके, इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसा यांचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण व शुद्ध उच्चारांसह केलेल्या सादरीकरणाचे उपस्थितांनी कौतुक केले.स्पर्धेचे परीक्षण सौ. प्रियंका फडके यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत श्लोकांचे नियमित पठण केल्याने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि संस्कार वृद्धिंगत होतात, असे मार्गदर्शन केले.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संजना बाईत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि गुरूंबद्दल आदरभाव निर्माण होण्यास निश्चितच मदत झाली.
-----------------------