ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परिणय फुके आक्रमक, लोकसंख्येप्रमाणे महाज्योतीला निधी देण्याची जोरदार मागणी
ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि परदेशी शिक्षणासाठी अधिक संधी मिळाव्यात, यासाठी भक्कम निधी आवश्यक असल्याचे डॉ. फुके म्हणाले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील (ओबीसी) विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांना १,५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी (Demand for allocation of ₹1,500 crore in funds) आमदार डॉ. परिणय फुके (Dr. Parinay Phuke) यांनी विधान परिषदेत केली. महाज्योतीला सध्या मिळणारा निधी ओबीसी समाजाच्या विस्ताराच्या तुलनेत अत्यंत अपुरा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाने यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्तता (Demand for the provision of funds) करावी, तसेच ओबीसी समाजाच्या सक्षमीकरणासाठी महाज्योतीला पुरेसा निधी देणे गरजेचे असल्याची भूमिका डॉ. फुके यांनी सातत्याने मांडली आहे.
महाज्योतीला मिळणाऱ्या निधीबाबत नाराजी व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, सारथी, बार्टी आणि महाज्योती या तीन संस्थांना शासन जवळपास समान निधी देते. मात्र, महाज्योती सुमारे ६० टक्के ओबीसी विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून, साडेतीनशे हून अधिक जातींमधील सुमारे ७ कोटी नागरिकांच्या शैक्षणिक आणि कौशल्य विकासाची जबाबदारी तिच्यावर असल्याचे डॉ. फुके यांनी निदर्शनास आणून दिले.
मागील अधिवेशनात महाज्योतीला १,५०० कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्याचे आश्वासन दिले होते. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि परदेशी शिक्षणासाठी अधिक संधी मिळाव्यात, यासाठी भक्कम निधी आवश्यक असल्याचे डॉ. फुके म्हणाले.
इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यावर उत्तर देताना म्हणाले, महाज्योतीचा निधी १,५०० कोटींपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवल्याचे सांगितले. सध्या ७२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यातील ४९९ कोटी विविध योजनांसाठी, १ कोटी वेतनासाठी आणि इमारत-वसतिगृहांसाठी २२८ कोटी रुपये उपलब्ध आहेत. महाज्योतीमार्फत ६,९०० प्रशिक्षणार्थी आणि १४ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. यूपीएससी, एमपीएससी आणि इतर क्षेत्रांत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे.