इयत्ता २री ते इयत्ता ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या पॅट-३ परीक्षेचे वेळापत्रक एससीईआरटीकडून जाहीर 

विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीचे मूल्यमापन करणे, शिकवण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करणे, राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमधील कामगिरी उंचावणे तसेच मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुधारणा कार्यक्रम तयार करणे या उद्देशाने ही PAT परीक्षा घेतली जाते. त्यामुळे ही परीक्षा पारदर्शक आणि प्रामाणिक पद्धतीने घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

इयत्ता २री ते इयत्ता ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या पॅट-३ परीक्षेचे वेळापत्रक एससीईआरटीकडून जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इयत्ता दुसरी ते आठवी विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या संकलित मूल्यमापन (पॅट-3) चाचणी परीक्षेचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने ((एससीईआरटी) जाहीर केले आहे. एप्रिलमध्ये ठराविक दिवशी ही परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना आतापासून (Exam preparation) तयारीला लागावे लागणार आहे. राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी होणारी संकलित मूल्यमापन चाचणी पॅट-3 एप्रिल महिन्यात घेतली जाणार आहे. एससीईआरटीने या चाचणीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर (Schedule announced) केले आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, 11 एप्रिल रोजी पहिली भाषा, 15 एप्रिल रोजी गणित आणि 22 एप्रिल रोजी इंग्रजी (तिसरी भाषा) या विषयांचे पेपर घेण्यात येणार आहेत. तसेच या परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाच संबंधित शाळेची पटसंख्या म्हणून गणना केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत चिंता वाढली आहे.

मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिका एससीईआरटीकडून पुरविल्या जाणार असून त्या निश्चित तारखेलाच घेणे सर्व शाळांसाठी बंधनकारक राहणार आहे. उर्वरित विषयांचे पेपर मात्र 11 ते 22 एप्रिल दरम्यान, पण 11, 15 आणि 22 एप्रिल वगळून, शाळांना त्यांच्या सोयीनुसार घेता येतील. या कालावधीत परीक्षा सुरू असताना शिक्षणाधिकारी आणि इतर अधिकारी अचानक शाळांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यामुळे ठरविलेल्या दिवशी सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असणार आहे. परीक्षा संपल्यानंतर सर्व प्रश्नपत्रिका शाळांनी जतन करून ठेवणेही आवश्यक राहील, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

तसेच शिक्षकांनी उत्तरपत्रिका योग्य पद्धतीने तपासल्या आहेत का? परीक्षा संपल्यानंतर त्यात काही फेरफार झाला आहे का? किंवा विद्यार्थ्यांना मुद्दाम जास्त गुण देण्यात आले आहेत का? याची तपासणी अधिकारी उत्तरपत्रिकांच्या पडताळणीद्वारे करणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीचे मूल्यमापन करणे, शिकवण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करणे, राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमधील कामगिरी उंचावणे तसेच मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुधारणा कार्यक्रम तयार करणे या उद्देशाने ही PAT परीक्षा घेतली जाते. त्यामुळे ही परीक्षा पारदर्शक आणि प्रामाणिक पद्धतीने घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.