१० वर्षांत १५२ पेपरफुटी, पण एकालाही शिक्षा नाही; विद्यार्थी कार्यक्रमात राहुल गांधींचा हल्लाबोल

देशातील ९ कोटी इच्छुकांपैकी केवळ ६ लाख विद्यार्थी यशस्वी होतात. याचा अर्थ १५० विद्यार्थ्यांपैकी फक्त एकाला यश मिळते. प्रामाणिकपणाचा मार्ग अवलंबणाऱ्या ९९ टक्के विद्यार्थ्यांचा अपमान पेपरफुटीमुळे होतो, असे त्यांनी सांगितले. 

१० वर्षांत १५२ पेपरफुटी, पण एकालाही शिक्षा नाही; विद्यार्थी कार्यक्रमात राहुल गांधींचा हल्लाबोल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

'छत्रौं की गुंज' कार्यक्रमात पेपरफुटीच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “गेल्या १० वर्षांत देशात १५२ पेपरफुटीच्या (152 paper leaks in the country in 10 years) घटना घडल्या, पण एकालाही शिक्षा झालेली नाही. वरपासून खालपर्यंत संपूर्ण यंत्रणा यात सामील आहे,” असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधींनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार (Corruption in the education system)  आणि अन्यायावर भाष्य केले. कार्यक्रमात पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांशीही त्यांनी चर्चा केली. 

राहुल गांधी म्हणाले की, पेपरफुटीमुळे ७.५ कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य बरबाद झाले आहे. “भारतात पेपरफुटीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. ही शिक्षण व्यवस्थेची दयनीय अवस्था आहे.” देशातील ९ कोटी इच्छुकांपैकी केवळ ६ लाख विद्यार्थी यशस्वी होतात. याचा अर्थ १५० विद्यार्थ्यांपैकी फक्त एकाला यश मिळते. प्रामाणिकपणाचा मार्ग अवलंबणाऱ्या ९९ टक्के विद्यार्थ्यांचा अपमान पेपरफुटीमुळे होतो, असे त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमात राहुल गांधींनी दोन मार्गांचा उल्लेख केला. पहिला प्रामाणिक मेहनतीचा, दुसरा भ्रष्टाचार आणि पेपरफुटीचा. १ टक्के लोक भ्रष्ट मार्गाने यश मिळवतात आणि उर्वरित विद्यार्थ्यांचे नुकसान करतात. “पहिला अन्याय म्हणजे शिक्षणाचा नऊ लाख रुपयांचा खर्च, पाचपैकी चार दरवाजे बंद होणे आणि शेवटचा अन्याय पेपरफुटीचा,” असे ते म्हणाले. 

कोचिंग सेंटर्स, माफिया, NTA, मंत्रालय अशी संपूर्ण साखळी पेपरफुटीत गुंतली आहे, असा आरोप त्यांनी केला. मृत विद्यार्थिनी रिया थापा यांच्या वडिलांनी मंचावर येऊन भावनिक अपील केले. “माझी मुलगी रात्रंदिवस अभ्यास करायची, पण पेपरफुटीमुळे तिने आत्महत्या केली,” असे सांगत ते ढसाढसा रडले. या दृश्याने उपस्थित विद्यार्थी आणि प्रेक्षक भावूक झाले. 

राहुल गांधींनी या कुटुंबीयांना सांत्वना दिली आणि अशा घटनांमागील व्यवस्थागत अपयशावर प्रकाश टाकला. राहुल गांधी म्हणाले, “ही राजकीय सभा नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याची आणि शिक्षण पद्धतीच्या सुधारणेची चर्चा आहे.” पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदे, स्वतंत्र तपास यंत्रणा आणि जबाबदारी निश्चित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा सन्मान व्हावा यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. या कार्यक्रमानंतर पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणेचा मुद्दा पुन्हा राष्ट्रीय स्तरावर चर्चेला आला आहे. NEET सारख्या परीक्षांतील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढता असंतोष दिसून येत आहे. राहुल गांधींच्या या विधानांनी विरोधकांना नवा मुद्दा मिळाला असून, सरकारकडून लवकरच उत्तराची अपेक्षा आहे.