दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, यंदा परीक्षा लवकर होणार..
बारावीच्या सर्वसाधारण, बायफोकल, व्यवसाय अभ्यासक्रम, माहिती-तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या ऑनलाइन व लेखी परीक्षा १६ जून ते ८ जुलैदरम्यान होतील. त्याचबरोबर प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षाही या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या (10th and 12th Examinations) पुरवणी परीक्षांचे (Supplementary Examination) वेळापत्रक जाहीर (Schedule Announced) केले आहे. मुख्य परीक्षांचे निकाल लवकर जाहीर झाल्याने यंदा पुरवणी परीक्षाही दरवर्षीच्या तुलनेत लवकर घेण्यात येणार आहेत. राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी (Dr. Triguna Kulkarni) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ३० जून दरम्यान आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ८ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणीसुधार परीक्षा या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून ही परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात घेतली जात होती. मात्र, यंदा निकाल लवकर लागल्याने मंडळाने जून-जुलैमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पुरवणी परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बारावीच्या सर्वसाधारण, बायफोकल, व्यवसाय अभ्यासक्रम, माहिती-तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या ऑनलाइन व लेखी परीक्षा १६ जून ते ८ जुलैदरम्यान होतील. त्याचबरोबर प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षाही या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा १६ ते ३० जूनदरम्यान होणार असून, प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षाही त्याच कालावधीत होतील. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले वेळापत्रक केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडून दिले जाणारे छापील वेळापत्रकच अंतिम मानले जाईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थित राहण्यापूर्वी छापील वेळापत्रकावरून तारखांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले की, “संकेतस्थळाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही वेबसाइट, सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवरून उपलब्ध होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये. अशा चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास राज्य मंडळ जबाबदार राहणार नाही. ”विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीसाठी केवळ शाळा/कॉलेज आणि राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरच अवलंबून राहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.