अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी
राज्यातील आकरावी प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. या प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. नियमित तीन फेऱ्या आणि त्यानंतरच्या विशेष पाच फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता ही शेवटची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील आकरावी प्रवेश प्रक्रिया (Class 11 Admission Process) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ (Academic year 2026-27) साठी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने (Centralized online system) सुरू आहे. या प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (Students whose admission has not been confirmed) अंतिम विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. नियमित तीन फेऱ्या आणि त्यानंतरच्या विशेष पाच फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता ही शेवटची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अंतिम विशेष फेरीची प्रक्रिया आज १२ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर (Dr. Mahesh Palkar) यांनी दिली आहे.
केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत एकूण १५ लाख ४५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १३ लाख २६ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी या अंतिम विशेष फेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा आणि अल्पसंख्याक कोट्यांतर्गत प्रवेशासाठीही स्वतंत्र प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

डॉ. महेश पालकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात. या फेरीत नोंदणी, अर्ज भरणे, दुरुस्ती आणि पसंतीक्रम निवडणे यांसाठी पुरेसा वेळ दिला जाणार आहे. प्रवेश प्रक्रिया पारदर्शक आणि विद्यार्थ्याभिमुख ठेवण्यासाठी सर्व काळजी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अंतिम विशेष फेरीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. नोंदणी, अर्ज भरणे, दुरुस्ती आणि पसंतीक्रम निवडणे ही प्रक्रिया १२ ऑगस्ट सकाळी १० वाजता सुरू होऊन १६ ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालेल. अलॉटमेंट प्रक्रिया १७ ऑगस्ट रोजी होईल. वाटप यादी १८ ऑगस्ट सकाळी १० वाजता प्रसिद्ध होईल. त्यानंतर प्रवेश निश्चितीची प्रक्रिया १८ ऑगस्ट सकाळी ११ वाजता सुरू होऊन २० ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालेल.
शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, वेळेत अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. या शेवटच्या संधीचा योग्य वापर करून प्रवेश प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे संचालनालयाने सांगितले आहे.