मुंबई विद्यापीठाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम; अप्रेंटिस ओरिएंटल पदवी अभ्यासक्रम सुरू

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून हा रोजगारभिमुख अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक पदवीचे शिक्षण घेतानाच प्रत्यक्ष उद्योगांमध्ये काम करण्याची आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळेल.

मुंबई विद्यापीठाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम; अप्रेंटिस ओरिएंटल पदवी अभ्यासक्रम सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) विद्यार्थी हित लक्षात घेऊन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे आणि वेंगुर्ले येथील महाविद्यालयांमध्ये लवकरच ‘अप्रेंटिस ओरिएंटल पदवी’ (Apprenticeship Oriented Degree) म्हणजेच शिकाऊ उमेदवारीवर आधारित नवीन अभ्यासक्रम सुरू (New curriculum launched) करण्यात येणार आहे. सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी (Vice-Chancellor Dr. Ravindra Kulkarni) यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून हा रोजगारभिमुख अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक पदवीचे शिक्षण घेतानाच प्रत्यक्ष उद्योगांमध्ये काम करण्याची आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळेल. ऑन-द-जॉब ट्रेनिंगच्या कालावधीत विद्यार्थ्यांना नियमांनुसार दरमहा स्टायपेंडही दिले जाईल. मुंबई आणि ठाणे येथील महाविद्यालयांमध्ये हा प्रयोग यशस्वीरीत्या सुरू झाला असून आता सिंधुदुर्गात तो लागू होत असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व रोजगारासाठी मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करावे लागणार नाही.

पर्यटन आणि मत्स्य औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष काम केल्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. पदवी अभ्यासक्रमाच्या सहा सेमिस्टरपैकी शेवटच्या वर्षात सहा महिने विद्यार्थ्यांना उद्योगाच्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करावे लागेल. भौगोलिक परिस्थितीनुसार महाविद्यालयांना अभ्यासक्रमात स्वायत्तता देण्यात आल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणींतर्गत महाविद्यालयांना दिल्या जाणाऱ्या स्वायत्ततेबाबत विद्यार्थी व पालकांनी शंका बाळगू नये, असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले. स्वायत्ततेमुळे शैक्षणिक नुकसान होत नसून उलट रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होतात. स्वायत्त महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न राहतात आणि अंतिम पदवी प्रमाणपत्रावर मुंबई विद्यापीठाचे नाव व लोगो कायम असतो. त्यामुळे पदवीची अधिकृतता आणि जागतिक मान्यता टिकून राहते.

स्वायत्त महाविद्यालयांना स्वतःचा अद्ययावत अभ्यासक्रम तयार करण्याचे स्वातंत्र्य असल्याने विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्यांचे शिक्षण मिळते. परीक्षा वेळेवर होऊन निकाल जलद लागतात. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांना ‘अधिकारप्रदत्त स्वायत्त’ दर्जा देण्यात आला असून त्यावर विद्यापीठ व युजीसीचे नियंत्रण कायम असते.

मुंबई विद्यापीठाने २०२४ मध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची शंभर टक्के अंमलबजावणी केली आहे. कौशल्य आणि उद्योजकता प्रशिक्षण तसेच अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण दिले जात आहे. सावंतवाडी येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू असून वेंगुर्ले येथे सागरी संशोधन केंद्र सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहितीही कुलगुरूंनी दिली. हा उपक्रम स्थानिक तरुणांना आत्मनिर्भर बनविण्यास मदत करेल