NEETचा पेपर पुण्यातून फुटला! १० ते १५ लाखांमध्ये विकला, धक्कादायक खुलासे समोर...

नाशिकचा शुभम आणि पुण्याचा रहिवासी धनंजय यांनी मिळून नीट पेपर लीक करण्याचा कट रचला होता. धनंजयने कथितरित्या पेपर शुभमला १० लाख रुपयांना विकला, त्यानंतर शुभमने टेलिग्रामद्वारे हा पेपर १५ लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे.

NEETचा पेपर पुण्यातून फुटला! १० ते १५ लाखांमध्ये विकला, धक्कादायक खुलासे समोर...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी (Medical Admissions) अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा (NEET Exam) यंदा पेपर फुटीच्या (Paper Leak) मोठ्या वादळात सापडली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित नाशिकचा शुभम खैरनार (Shubham Khairnar) याला सीबीाय टीमने मध्यरात्री नाशिक पोलिसांकडून ताब्यात घेऊन मुंबईकडे रवाना केले आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या प्रकरणात मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीची साखळी समोर आली असून, पुण्यातील एक साथीदारही (A Companion from Pune) यात सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीबीआयने शुभम खैरनार याची रात्री उशिरापर्यंत प्राथमिक चौकशी केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकचा शुभम आणि पुण्याचा रहिवासी धनंजय यांनी मिळून नीट पेपर लीक करण्याचा कट रचला होता. धनंजयने कथितरित्या पेपर शुभमला १० लाख रुपयांना विकला, त्यानंतर शुभमने टेलिग्रामद्वारे हा पेपर १५ लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे. या व्यवहारानंतर पेपर हरियाणाकडे पाठवण्यात आला असल्याचे उघड झाले आहे. तपासात असेही समोर आले आहे की, शुभम आणि धनंजय यांनी यापूर्वीही काही ग्रुप्सना हा पेपर फॉरवर्ड केला होता.

या प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. नाशिकमधून अटक केलेल्या शुभम खैरनार याचा एक साथीदार पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हा तरुण मूळचा अहिल्यानगर येथील असून, मंगळवार दुपारपासून त्याचा मोबाईल बंद असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. सीबीाय आणि राज्य पोलिस यंत्रणा सध्या मोठ्या नेटवर्कचा शोध घेत आहेत. या प्रकरणात आणखी काही जण अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेपर फुटीची माहिती कशी मिळाली, कोणत्या पातळीवरून गळती झाली याचा सखोल तपास सुरू आहे.

या प्रकरणात लाखो रुपयांची आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. शुभम खैरनार यांची स्वतःची मेडिकल काऊन्सलिंग एजन्सी असल्याचे सांगितले जाते. पेपर मिळवल्यानंतर नफ्याची संधी साधत त्याने तो इतरांना विकला. नंतर हा पेपर इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वणव्यासारखा पसरला, ज्यामुळे परीक्षेची गोपनीयता पूर्णपणे भंग पावली, असल्याचा पोलिसांनी अंदाजल वर्तवला आहे. 

३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेनंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्षभर कठोर मेहनत घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी निराशा आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. अनेक विद्यार्थी परीक्षेनंतर गावी परतले किंवा पालकांसोबत सुट्टीसाठी बाहेर गेले होते. आता पुन्हा परीक्षा कधी घेण्यात येणार, काऊन्सलिंग प्रक्रिया कशी होणार याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. देशभरातील लाखो विद्यार्थी विविध शहरांतील कोचिंग क्लासेससाठी येतात. या प्रकरणामुळे त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.