शिक्षक भरती प्रक्रिया सुरू! पवित्र पोर्टलवर जाहिरातींसाठी ३१ मे पर्यंत मुदत
माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला असून, मे २०२६ अखेरपर्यंत रिक्त होणाऱ्या संभाव्य पदांना विचारात घेऊन ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. नियुक्ती प्राधिकाऱ्यांना रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेत मागणी नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील शिक्षक भरतीची (Teacher Recruitment) प्रतीक्षा करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दिलासाजनक अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तालयाने 'पवित्र पोर्टल'द्वारे (Pavitra Portal) शिक्षक पदभरतीची प्रक्रिया गतिमान केली आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि खासगी शैक्षणिक संस्थांना रिक्त शिक्षक पदांच्या जाहिराती प्रसिद्ध (Appeal Announce Vacant Teachers Post) करण्यासाठी ३१ मे २०२६ पर्यंतचा कालावधी निश्चित करून देण्यात आला आहे. शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह (Sachindra Pratap Singh) यांनी याबाबत स्पष्ट आदेश जारी केले आहेत.
माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला असून, मे २०२६ अखेरपर्यंत रिक्त होणाऱ्या संभाव्य पदांना विचारात घेऊन ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. नियुक्ती प्राधिकाऱ्यांना रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेत मागणी नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.यापूर्वी अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया ३१ मार्च २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे रिक्त पदांची नेमकी संख्या पवित्र पोर्टलवर उपलब्ध होणे सोपे झाले आहे. आता सर्व संबंधित संस्थांनी विहित मुदतीत जाहिराती प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण आयुक्तालयाने केले आहे.
ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यातील शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेवर बऱ्याच प्रमाणात तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. विशेषत: ग्रामीण भाग आणि खासगी संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासाठी ही संधी महत्त्वाची ठरणार आहे. पवित्र पोर्टलवर सर्व प्रक्रिया ऑनलाइन पार पडणार असल्याने पारदर्शकता आणि गती दोन्ही राखली जाईल, असे मानले जात आहे.
उमेदवारांनी पवित्र पोर्टल नियमित तपासणे आणि अधिकृत जाहिरातींनुसार अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ३१ मे नंतर कोणत्याही नवीन जाहिराती स्वीकारल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया राज्यातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारी आणि बेरोजगार शिक्षक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी ठरणार आहे. शिक्षण विभागाने वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.