सुट्टी नसतानाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बंद? कारण...
विद्यापीठातील सर्वसाधारण विभाग, शैक्षणिक प्रवेश विभाग, परीक्षा विभाग, संलग्नता विभाग अशा सर्व प्रमुख विभागातील कर्मचाऱ्यांना तसेच विविध विभागातील प्राध्यापकांना जनगणनेची कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यापीठात विविध विभागाचे उपकुलसचिव, शिपाई आणि एखादा लिपिक एवढेच कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यापीठाला सुट्टी नसतानाही विद्यापीठाचे कामकाज पूर्णपणे बंद पडले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तब्बल 80 टक्के कर्मचारी व अधिकारी जनगणनेच्या कामासाठी दररोज विद्यापीठाबाहेर सेवा देत आहेत.त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागासह सर्व प्रमुख विभागातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
ऐन प्रवेश प्रक्रियेच्या कालावधीत कर्मचारी विद्यापीठात काम करण्यास उपलब्ध नसल्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर तसेच परीक्षेच्या निकालांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यापीठात काही काम असल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी कार्यालयक्त उपस्थित असल्याची खातरजमा करूनच संबंधितांनी विद्यापीठात येणे सोईचे ठरणार आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशभरात जनगणनेचे काम सुरू असेल सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यापीठातील तब्बल 80 टक्के कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठातील सर्वसाधारण विभाग, शैक्षणिक प्रवेश विभाग, परीक्षा विभाग, संलग्नता विभाग अशा सर्व प्रमुख विभागातील कर्मचाऱ्यांना तसेच विविध विभागातील प्राध्यापकांना जनगणनेची कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यापीठात विविध विभागाचे उपकुलसचिव, शिपाई आणि एखादा लिपिक एवढेच कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यापीठाला सुट्टी नसतानाही विद्यापीठाचे कामकाज पूर्णपणे बंद पडले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नाशिक, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या महाविद्यालयातून विद्यार्थी व कर्मचारी शैक्षणिक कामासाठी विद्यापीठात येत आहेत.परंतु,त्यांची कामे करण्यासाठी विद्यापीठात मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने त्यांना हात हलवत परत जावे लागत आहे.
मुळात विद्यापीठाकडे एकूण मंजूर क्षमतेच्या सुमारे 40 ते 50 टक्केच मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यातीलही बहुतांश सर्व कर्मचारी जनगणनेच्या कामाला गेल्याने विद्यापीठ कसे चालवावे असा प्रश्न विद्यापीठ प्रशासनासमोर उभा राहिला आहे. जनगणना हे देशसेवेचे काम असून विद्यापीठ चालवणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. मात्र.त्यातून मार्ग कसा काढावा, असा सवाल विद्यापीठ प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
--------------
विद्यापीठ प्रशासनाने अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील विद्यापीठाच्या उपकेंद्रावर सर्व शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्न सोडवण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, तरीही काही महत्त्वाचे काम असल्यास संबंधितांनी त्या कामाशी निगडित असणाऱ्या व्यक्ती विद्यापीठ कार्यालयात जनगणनेच्या कामामुळे कोणत्या वेळी उपलब्ध आहेत, याची माहिती घेऊनच विद्यापीठ परिसरात यावे.
- डॉ. प्रफुल्ल पवार, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ