अकरावीच्या पहिल्या फेरीतून केवळ 50 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश; विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत
पहिल्या प्रवेश फेरीअंतर्गत ३ जून २०२६ रोजी एकूण ४ लाख ७ हजार २७३ विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आपले प्रवेश निश्चित केले. प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ७५ हजार ६६८ विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) प्रवेश मिळाला असून, ३१ हजार ६०५ विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन व अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत प्रवेश घेतला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली असून प्रवेशाच्या पहिल्या फेरीतून केवळ 4 लाख 7 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतरही केवळ 50 टक्के विद्यार्थ्यांनाचा प्रवेश घेता आला आहे. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे लाखो विद्यार्थ्यांना या वर्षी सुध्दा प्रवेशासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
, राज्यातील एकूण ९ हजार ५९१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीआतापर्यंत एकूण १२ लाख ५१ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८ लाख ८७ हजार २६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ (कनिष्ठ महाविद्यालय पसंतीक्रम) अंतिम करून प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदविला. यापैकी पहिल्या प्रवेश फेरीअंतर्गत ३ जून २०२६ रोजी एकूण ४ लाख ७ हजार २७३ विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आपले प्रवेश निश्चित केले. प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ७५ हजार ६६८ विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) प्रवेश मिळाला असून, ३१ हजार ६०५ विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन व अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत प्रवेश घेतला आहे.
विभागनिहाय आकडेवारीनुसार पुणे विभागाने सर्वाधिक ७९ हजार ८२५ प्रवेशांची नोंद केली आहे. त्या खालोखाल मुंबई विभागात ६८ हजार २०९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. लातूर विभागात सर्वात कमी २५ हजार ८२२ प्रवेश झाले आहेत.
राज्यातील प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असला तरी पहिल्या फेरीत सुमारे ४.०७ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्याने यंदा शिक्षण विभागाला नियोजित प्रवेश फेऱ्यापेक्षा अधिक प्रवेश फेऱ्या घ्याव्या लागणार असल्याचे दिसून येत आहे. आता प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीतून आपल्या पसंतीचे कनिष्ठ महाविद्यालय निवडण्याची संधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
दरम्यान काही कारणास्तव अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी न झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश दुसऱ्या फेरीत केला जाणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांना आपल्या घराजवळील आणखी काही कॉलेजचे पर्याय प्रवेशासाठी उपलब्ध होणार आहेत.